मुंबई – महागाई विरोधात काळे कपडे घालून काँग्रेसने आंदोलन केले. याचा संबंध भाजपने अयोध्येतील श्रीराम मंदिर भूमिपूजनाशी जोडला, असे म्हणत शिवसेनेने सामनाच्या संपादकीयमधून भाजपवर निशाणा साधला. यावेळी धर्म ही अफूची गोळी असल्याचे म्हणत बहुसंख्य जनतेला हीच अफूची गोळी पुन्हा चारली जात असल्याची टीका करण्यात आली. आता या टीकेवर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
भातखळकर यांनी ट्विट करत सामनाच्या संपादकीयचा चांगला समाचार घेतला आहे. आपल्या ट्विटमध्ये भातखळकर म्हणतात,”सरबरलेले, गोंधळलेले बुळबुळीत नेतृत्व. ज्वलंत हिंदुत्वाचा नारा देणारे आता म्हणतायत धर्म ही अफुची गोळी”.
काय म्हटलंय सामना संपादकीयमध्ये
महागाई, बेरोजगारी, जीएसटीच्या प्रश्नांवर आणि ‘ईडी’ वगैरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या अतिरेकी वागण्यावर काँग्रेस हा एकमेव पक्ष लढा देत आहे. रस्त्यावर उतरत आहे हे चित्र निर्माण झाले आहे व त्याची दखल देशातील अन्य विरोधी पक्षांनी घेऊ नये याचे आश्चर्य वाटते.
प्रत्येक समस्या, प्रश्नांचा संबंध धर्माशी जोडणे कितपत योग्य आहे? महागाई-बेरोजगारीचा भस्मासूर उसळला आहेच.
महागाई व बेरोजगारीवर राम मंदिर हा उतारा नाही.
राम मंदिर ही श्रद्धा व राष्ट्रीय अस्मिता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या कृपेने अयोध्येत राम मंदिर होतच आहे.
मात्र लोकांनी तुम्हाला सत्ता जी दिली आहे, ती सर्वसामान्यांचे जगणे सुसहय़ करायला, असेही त्यांनी नमूद केलेय.