मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा 2022-23चा अर्थसंकल्प सादर केला. अजित पवार यांनी विकासाची पंचसूत्री सादर करताना कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास, दळणवळण आणि उद्योग या क्षेत्रांसाठी तब्बल 1 लाख 15 हजार 215 कोटी रुपयांचा नियतव्यय प्रस्तावित असल्याची माहिती दिली. यानंतर विरोधी पक्षाकडून या अर्थसंकल्पावर टीका करण्यात येत आहे.
अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना भाजप आमदार आशिष शेलार म्हणाले, राज्य सरकारने आज मांडलेला अर्थसंकल्प हा पंचसूत्रीचा विकासाच्या आधारावर नसून पानचट, पचपचीत आणि प्रतिगामी असा अर्थसंकल्प आहे. हा स्व-राज्याचा अर्थसंकल्प वाटत नसून स्व-हिताचा अर्थसंकल्प आहे. शेतकऱ्यांसाठी आम्ही खूप काही केले, असे सांगितले गेले. पण प्रत्यक्षामध्ये आर्थिक पाहणी अहवालात बघितले की, करोना काळामध्ये शेतकरी खासगी सावकाराकडे वळला हे दिसून आले आहे. या शेतकऱ्यांच्या मदतीबाबत चकार शब्द सुद्धा या अर्थसंकल्पात काढला नाही.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, आजचा अर्थसंकल्प राज्याच्या विकासाला चालना देणारा आहे. शेतकऱ्यांसाठी भरीव तरतूद करण्यात आलेली आहे, गुंतवणूक वाढवून रोजगार निर्मितीवर भर देण्यात आला आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प असून कल्याणकारी योजनांच्या माध्यमातून राज्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर घेऊन जाणारा अर्थसंकल्प आहे.