मुझफ्फरनगर – मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला. शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता अजूनही झाली नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी वर्षभर दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. कायदे मागे घेण्यात आल्यानंतर शेतकऱ्यांनी ते आंदोलन स्थगित केले. त्यावेळी शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांचा विचार करण्याचे आश्वासन मोदी सरकारकडून देण्यात आले. मात्र, ती आश्वासने अद्याप पाळली गेली नसल्याकडे मलिक यांनी येथे पत्रकारांशी बोलताना लक्ष वेधले.
शेतमालाला किमान आधारभूत किमतीची (एमएसपी) हमी देणारा कायदा सरकारने करायला हवा, अशी पुस्तीही त्यांनी जोडली. देशाला सध्या महागाई, बेरोजगारीसारखे गंभीर मुद्दे भेडसावत आहेत. मात्र, ते सोडून अर्थहीन मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
मलिक सातत्याने विविध मुद्द्यांवरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडताना दिसतात. त्या सरकारवर टीका करू नये. मौन बाळगल्यास तुम्हाला राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती बनवले जाऊ शकते असा सल्ला मला काही मित्रांनी दिला होता. मात्र, मला पदांची लालसा नाही, असे वक्तव्य मलिक यांनी काही दिवसांपूर्वी केले होते.