मोदी, शहांवर यशवंत सिन्हांचा निशाणा
नवी दिल्ली : भाजपचे अध्यक्ष व गृहमंत्री अमित शहा यांनी देशातील सध्याच्या वातावरणाला व हिंसाचाराला देशात कार्यरत असलेली तुकडे-तुकडे गॅंग कारणीभूत असल्याची टीका केली होती, त्या टिकेचा भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांनी जोरदार समाचार घेतला आहे.
सिन्हा यांनी म्हटले आहे की देशातील सर्वात घातक तुकडे-तुकडे गॅंग दोन माणसांची असून ते दोघेही भाजपमध्येच असून ते दुर्योधन आणि दु:शासन आहेत. त्यांच्यापासून सावध राहा असे यशवंत सिन्हा यांनी म्हटले आहे. मोदी आणि शहा यांचा प्रत्यक्ष नामोल्लेख टाळून त्यांनी त्यांना उद्देशूनच ट्विटरवर ही टीका केली आहे.
अमित शहांनी दिल्लीतील एका भाषणात देशात सध्या कॉंग्रेस व मित्र पक्षांनी हिंसाचाराचे वातावरण निर्माण केले असल्याची टीका करताना त्यांच्यावर ही टुकडे-टुकडे गॅंग असल्याचा आरोप केला होता. त्याच्याही आधी पंतप्रधान मोदींनी विरोधकांचा उल्लेख शहरी नक्षलवादी असा केला होता.
त्या दोघांचा एकत्र समाचार घेताना यशवंत सिन्हा यांनी त्यांना दुर्योधन आणि दु:शासन अशा महाभारतातील खलनायकांच्या उपमा देऊन या दोन जणांची गॅंगच देशातील सर्वात घातक टुकडे-टुकडे गॅंग असल्याचे म्हटले आहे. मोदी-शहा यांच्यावर इतक्या कडक शब्दात सिन्हा यांनी टिका करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
या आधी सिन्हा यांनी वेळोवेळी मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांवर आणि त्यांच्या एकूणच कार्यपद्धतीवर जोरदारपणे टीका केली असली तरी त्यांनी इतक्या बोचऱ्या शब्दांचा आश्रय घेतला नव्हता.
सिन्हा हे माजी अर्थमंत्री असल्याने त्यांनी नेहमी विधायक शब्दांचाच आधार घेत मोदी सरकारची कमतरता दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. पण आता ते या सरकारच्या विरोधात आधिक आक्रमक झाले असल्याचे या ट्विटर संदेशातून स्पष्ट झाले आहे.