नवी दिल्ली: भाजपकडून देशात जातीय विद्वेष पसरवला जात असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज केला. भाजपमुळे देशाच्या सामाजिक सौहार्दतेचे गंभीर नुकसान होत असल्याचा आरोपही त्यांनी कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये बोलताना केला. देशाच्या सामाजिक सौहार्दाचे जे नुकसान होते आहे त्याबद्दल प्रत्येक भारतीयाने गंभीर चिंता केली पाहिजे आणि हे नुकसान भरून काढण्याचे काम कॉंग्रेस पक्षाला करावे लागणार आहे, असेही त्या म्हणाल्या.
करोना विषाणूचा प्रादुर्भाव गेल्या तीन आठवड्यांत अत्यंत त्रासदायकपणे वाढला आहे असे सांगून सोनिया गांधींनी चाचण्या वाढवण्याचे आवाहन सरकारला केले. लॉकडाऊन लागू झाल्यापासून या संदर्भात आपण अनेकवेळा पंतप्रधानांना पत्र लिहीले आहे. त्यात काही उपाय योजनाही सुचवल्या असून विधायक सहकार्यही देऊ केले. मात्र दुर्दैवाने पंतप्रधानांकडून पक्षपातीपणा केला जातो आहे. केंद्र सरकारकडून तत्परतेने कृती होण्याऐवजी दयाळूपणा, मनाचा मोठेपणाचा अभावच दर्शवला जातो आहे. सध्या आरोग्य, अन्न सुरक्षा आणि उपजिविकेशी संबंधित मुद्दयांवर कॉंग्रेस पक्षाचे लक्ष केंद्रीत आहे, असेही सोनिया गांधी म्हणाल्या.
लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्यात देशभरातल 12 कोटी लोकांचा रोजगार बुडाला आहे. त्यामुळे सरकारने लघु, मध्यम, सुक्ष्म उद्योगक्षेत्रासाठी “जीडीपी’च्या एकतृतीयांश इतके मदतीचे पॅकेज द्यावे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
स्थलांतरित कामगारांच्या प्रश्नांकडे प्रथम प्राधान्य म्हणून लक्ष देणे आवश्यक आहे. 3 मे नंतर केवळ जिथे करोनाचे हॉटस्पॉट आहेत, तेथेच लागू करण्यात यावा, अशी मागणी कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली.
तर लॉकडाउनचे यशापयश हे लॉकडाऊननंतर “कोविड-19’ला नियंत्रित करण्याच्या आपल्या क्षमतेवर अवलंबून असेल, असे मत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केले. कॉंग्रेसचे महत्वाचे वरिष्ठ नेते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या बैठकीस उपस्थित होते. देशभर लॉकडाऊन लागू झाल्यापासून गेल्या तीन आठवड्यात कॉंग्रेस कार्यकारिणीची अशाप्रकारे दुसऱ्यांदा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बैठक झाली.