मुंबई – राज्यमंत्रिमंडळ विस्तारानंतर रविवारी (दि. 14) राज्य सरकारचे खातेवाटप जाहीर झाले आहे. यामध्ये महत्वाची खाती भाजपकडे आल्याचे पाहायला मिळत आहेत. माजी अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केलेले बजेट पाहिले तर भाजपाच्या मंत्र्यांकडे 80 टक्के निधी दिसतो. मुख्यमंत्रीपद हे महत्त्वाचे पद आहेच. पण या पदापेक्षाही जनतेचा थेट संबंध असलेली खाती आपल्याकडे घेण्याचा फॅर्म्युला राज्यात राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस काळात राबवला गेला. आता तीच पध्दत यावेळी भाजपाने वापरल्याचे पाहायला मिळत आहे.
मनावर मोठा दगड ठेवून भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिले. खातेवाटपात मात्र सत्तेतला 80 टक्के वाटा भाजपाने स्वत:कडे घेतला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार अशी आठ खाती आहेत. त्याचबरोबर भाजपातील इतरही मंत्र्यांकडे महत्वाची खाती आली आहेत.
राधाकृष्ण विखे-पाटील – महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास, डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास, गिरीष महाजन- ग्राम विकास आणि वैद्यकीय शिक्षण, रविंद्र चव्हाण – सार्वजनिक, अन्न व नागरी पुरवठा, मंगलप्रभात लोढा – पर्यटन, महिला व बालविकास, सुधीर मुनगंटीवार – वन, चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, सुरेश खाडे – कामगार, अतुल सावे – सहकार, अशी महत्त्वाची खाती भाजपकडे आहेत.
तर शिंदे गटाकडे, गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छता, दादा भुसे -बंदर व खनिकर्म, संजय राठोड – अन्न व औषध प्रशासन, संदीपान भुमरे – रोजगार हमी योजना व फलोत्पादन अशी दुय्यम खाती आली आहेत. शिंदेगटाकडे त्यातल्या त्यात उदय सामंत यांना उद्योग, तानाजी सावंत यांना सार्वजनिक आरोग्य, अब्दुल सत्तार यांना कृषी तर दीपक केसरकर यांना शालेय शिक्षण अशी खाती आहेत. मंत्र्यांचा प्रभाव दाखवतील अशी दोन-तीन खाती शिंदेगटाकडे आहेत. दरम्यान, शिंदे गटातील मंत्री हे खातेवाटपावरून नाराज असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री शिंदेसेनेचा असला तरी राज्यात बोलबाला मात्र भाजपाचाच राहणार असल्याचे येत्या अडीच वर्षात पाहायला मिळणार आहे.