Ambadas Danve : नाशिक शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गटमेळावा पार पडला. या मेळाव्यात विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेची ताकद आपल्यालाच माहीत नाही, मुंबईत आपलं आंदोलन दाबण्याचा प्रयत्न झाला. आंदोलन का दाबलं जात आहे, जेंव्हा त्याचा भडका उडणार असतो. भाजप उन्मात हत्तीसारखं वागत आहे, आपल्याला हा उन्मत्तपणा खत्म केला पाहिजे, असं म्हणत अंबादास दानवे यांनी भाजपवर निशाणा साधला.
शिवसेना प्रमुख शरीर रूपाने आपल्यामध्ये नसतील पण त्यांचा विचार आपल्या रोमरोममध्ये रुजलेला आहे. सत्ता येईल आणि जाईल, संघटनेचे काम आपण सत्तेसाठी करत नाहीत. आपल्याला पक्षाचा विचार रुजवायचा आहे, हे काम संघटनेचे आहे. राहुल गांधी यांना सुद्धा खुशवंत सिंह या पत्रकारने सांगितले की, तुम्हाला संघटनेचे काम कसे असते जाणून घ्यायचा असेल तर महाराष्ट्रमध्ये जा आणि शिवसेना पक्षप्रमुखांचे काम बघा, असा किस्सा अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना सांगितला.
पुढे बोलताना म्हणाले, काहीजण व्हाट्सअप आंदोलन करणारे आम्ही बघत आहोत, आपल्याला जबाबदाऱ्या ओळखता आल्या पाहिजे. गटप्रमुखांपासून सगळ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली पाहिजे. जनतेमध्ये आपण जात नाही, जनतेमध्ये जाणे गरजेचे असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितले.
समोर दिसताच दानवे खैरे यांच्या पाया पडले
गेल्या अनेक दिवसांत माजी खासदार चंद्रकांत खैरे आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबदास दानवे यांच्यातील वाद चर्चेचा विषय ठरला आहे. हे दोन्ही नेते उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षातील असून त्यांचे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठे प्रस्थ आहे. असं असलं तरी या दोन्ही नेत्यांमध्ये वर्चस्ववादातून वाद निर्माण झाले आहेत. आता मात्र या दोन्ही नेत्यांमधील वाद मिटला का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
कारण आमच्यात वाद नव्हते. माझ्याकडून तर कोणताही वाद नव्हता, असं दानवे म्हणाले. तर मी चार पावले मागे यायला तयार आहे, असं खैरे म्हणाले आहेत. विशेष म्हणजे शिवसेना पक्षाचा नाशिक शहरात गटमेळावा पार पडला. या गटमेळाव्याच्या कार्यक्रमात अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन्ही नेते उपस्थित होते. यावेळी अंबादास दानवे हे चंद्रकांत खैरे यांच्या पाया पडले आहेत.