श्रीनगर – भाजपचे मंत्री मुस्लिमांना त्रास देण्याची चढाओढ लावत आहेत. मुस्लिमांना चिथावणी देऊन त्यांचा नरसंहार घडवण्याची संधी भाजप शोधत आहे, असा आरोप जम्मू काश्मीरमधील “पीडीपी’च्या नेत्या मेहबुबा मुफ्ती यांनी केला आहे. मदरशांचे अस्तित्व संपूर्णपणे संपुष्टात यायला पाहिजे, असे आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी म्हटले होते. त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना मेहबुबा बोलत होत्या.
हे वक्तव्य काही नवीन नाही. संघाच्या शाखांमध्या तलवार आणि धनुष्यबाण चालवायला शिकवले जाते. देशाला गुजरात किंवा उत्तर प्रदेशचे मॉडेल बनवण्यासाठी एक चढाओढ सुरू झाली आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांना याहीपुढे जायचे आहे, असे मेहबुबा म्हणाल्या, पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या मुख्यालयामध्या आयोजित कार्यक्रमामध्ये पत्रकारांबरोबरच्या वार्तालापाच्यावेळी त्या बोलत होत्या.
भाजपशासित राज्यांमध्ये मुस्लिमांना अलिकडच्या काळात दिल्या गेलेल्या वागणूकीचा इतिहास आठवून पहावा, असेही मेहबुबा म्हणाल्या.
बाजपचे नेते “मंदिर-मशिद’ असे संवेदनशील विषय मुद्दाम उकरून काढत आहेत. मुस्लिमांना चिथावणी देण्यासाठीच असे विषय काढले जात आहेत. अशा विषयांवर मुस्लिमांनी प्रतिक्रिया दिली की भाजपला पुन्हा एकदा गुजरात आणि उत्तर प्रदेशात जसा रक्तपात झाला होता, तसा रक्तपात करण्याची संधी मिळू शकेल, असे त्या म्हणाल्या. स्वातंत्र्यपूर्व काळात ज्याप्रमाणे ब्रिटीश हिंदू मुस्लिमांमध्ये फूट पाडत होते, तेच काम आज भाजप करत आहे, अशी टीकाही मेहबुबा मुफ्ती यांनी केली.