Ganesh Naik On Nitesh Rane : सहर शेख यांच्या ‘हिरव्या मुंब्रा’ विधानावरून भाजपमध्ये मतभेद; मंत्री गणेश नाईकांचं मोठं विधान
Ganesh Naik On Nitesh Rane : एमआयएम नगरसेविका सहर शेख यांच्या 'हिरव्या मुंब्रा' विधानावरून भाजपमध्ये मतभेद

Ganesh Naik On Nitesh Rane : एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख यांच्या एका विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. “मुंब्रा शहर हिरवं करू” असं वक्तव्य केल्यानंतर सहर शेख यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उठली असून, या विधानाचा राजकीय अर्थ काढत विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
या प्रकरणात भाजपचे मंत्री नितीश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत सहर शेख यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांनी या वक्तव्याचा संबंध थेट देशविरोधी मानसिकतेशी जोडत कडव्या शब्दांत टीका केली होती. मात्र, याच मुद्द्यावरून आता भाजपमध्येच मतभेद असल्याचं चित्र समोर आलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री गणेश नाईक यांनी सहर शेख यांच्या विधानावर वेगळी भूमिका मांडली आहे. याबाबत बोलताना गणेश नाईक म्हणाले, “पाकिस्तानचा हिरवा इथे येऊ देणार नाही. मात्र, भांडवल करायचं ठरवलं तर कशाचंही करता येतं.” त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
गणेश नाईक यांच्या या विधानामुळे भाजपच्या भूमिकेत एकवाक्यता नसल्याचं स्पष्ट झालं आहे. एकीकडे नितीश राणे आक्रमक पवित्रा घेत असताना, दुसरीकडे गणेश नाईक यांनी संयमी आणि वेगळा सूर लावल्याने भाजप अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत.
दरम्यान, सहर शेख यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत कोणताही देशविरोधी अर्थ नसल्याचं स्पष्ट केलं असलं, तरी हा मुद्दा आता केवळ स्थानिक राजकारणापुरता मर्यादित राहिलेला नाही. सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात या विधानावरून जोरदार चर्चा सुरू आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे आगामी काळात मुंब्रा आणि ठाणे परिसरातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजप नेत्यांमधील विरोधाभासी भूमिकांमुळे हा वाद पुढे कसा वळण घेणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
सहर शेख यांचं विधान काय?
महापालिका निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर सहर शेखने विजयी समारोहाच्या कार्यक्रमात विरोधकांना ‘कैसा हरया..’ म्हणत डिवचलं. एवढ्यावरच न थांबवता पुढे येणाऱ्या काळात आपल्याला आपली ताकद दाखवून द्यायची आहे तसेच संपूर्ण मुंब्रा शहर हे आपल्याला हिरवे करायचे आहे’ असं वक्तव्य सुद्धा केलं. ज्यामुळे वाद निर्माण झाला.






