जळगाव – जळगाव महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे 28 नगरसेवक फुटले होते. या पराभवामुळे नाचक्की झालेल्या भाजपने फुटीर नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करण्यासाठी पक्षातर्फे नाशिक विभागीय आयुक्तांकडे तब्बल तीस हजार पानांची याचिका दाखल केली आहे. लवकरच त्याची सुनावणी होणार आहे. जळगाव महापालिकेच्या महापौर, उपमहापौर पदासाठी नुकतीच ऑनलाइन निवडणूक झाली. यामध्ये बहुमत नसतानाही शिवसेनेने भाजपचे तब्बल 27 नगरसेवक फोडून महापलिकवर आपला महापौर, उपमहापौर निवडून आणला. यामुळे संपूर्ण राज्याच्या राजकरणात खळबळ उडाली होती.
भारतीय जनता पक्षाला नामुष्की पत्करावी लागली. भारतीय जनता पक्षाचे नेते गिरीश महाजन यांनी या फुटीर नगरसेवकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. फुटलेल्या नगरसेवकांना अपात्र ठरवण्याची कारवाई करावी यासाठी पक्षाकडून आज याचिका दाखल करण्यात आली आहे.
जळगाव महापालिकेतील भारतीय जनता पक्षाचे गटनेते भगत बालानी, यांनी ही याचिका दाखल केली आहे. नगरसेवकांनी ऑनलाइन केलेले मतदान,असे अनेक पुरावे आहेत. त्यामुळे या फुटीर नगरसेवकांवर निश्चित कारवाई होईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाने दाखल केलेली तीस हजार पानांची याचिका राज्यातील महापालिकेच्या इतिहासातील पहिलीच याचिका आहे. त्यामुळे या याचिकेवर काय निकाल लागतो या कडे राज्याचे लक्ष असणार आहे.