मुंबई : राज्यातील राजकीय संघर्ष शिगेला पेटला आहे. राज्यपाल भातसिंग कोश्यारी यांनी शिवसेनेला उद्याच बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. बंडखोर आमदारांना घेऊन भाजप देखील सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. असे असताना काँग्रेस नेते नाना पटोले यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. त्यांना फक्त खुर्ची कशी मिळेल यासाठी प्रयत्न सुरु आहे. असा अप्रत्यक्ष टोला पटोले यांनी भाजपला लगावला आहे.
याबाबत बोलताना पटोले म्हणाले , “जनता संभ्रमात आली आहे. एकीकडे राज्यात पाऊस नाही, भाजपला सत्तेच्या लालसेपोटी जनतेच्या, शेतकऱ्यांच्या प्रश्नांशी काही घेणं देणं नाही. फक्त खुर्ची कशी मिळेल यासाठी सगळे प्रयत्न सुरू आहेत. 1 जुलैला शपथविधी होणार, अशा घोषणाही ते करू लागले आहेत. नेमकं काय चाललंय ते कळतच नाही,” असं नाना पटोले म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले , काँग्रेसचं स्पष्ट आहे, दु:खात असो किंवा सुखात, आपण सोबत राहायचं. ज्याच्याशी मैत्री करायची, ती प्रामाणिक करायची. ज्याच्या भरोशावर मोठं व्हायचं आणि त्याचंच घर पोखरून टाकायचं ही काँग्रेसची भूमिका नाही. ही भाजपची भूमिका आहे. सत्तेपेक्षा राज्यात स्थिरता असणं महत्त्वाचं आहे. हाच आमचा प्रयत्न आहे. विरोधात बसायला आम्हाला काही अडचण नाही”, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवाय पुढे बोलताना त्यांनी सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला त्याबाबतही माहिती दिली. ते म्हणाले सोनिया गांधी यांनी नाना पटोले यांना फोन वरून चर्चा करीत आम्ही तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. असे सांगतानाच सध्याच्या लढाईत काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले.