नगर – भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी नगर शहरासह शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपचा सहभाग जेमतेमच दिसत असून त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते तोंड दाखविण्यापूरतेच दिसत आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजप हात आखडता घेणार असले तर भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातही शिवसेना ती भूमिका घेईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.
महायुतीमध्ये नगर जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याला आठ तर शिवसेनेच्या वाट्याला चार मतदारसंघ आले आहेत. भाजपने सर्वाधिक जागा घेवून शिवसेनेची अधीच अडचण निर्माण केली आहे. त्यात शिवसेनेकडे संगमनेर, नगर शहर, श्रीरामपूर व पारनेर हे चार विधानसभा मतदारसंघ आहे. नगर शहरासह पारनेर व संगमनेरमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. पण हे कार्यकर्ते युतीचा धर्म केवळ वरवर पाळत असल्याचे दिसत आहे. उमेदवार त्यांचे समर्थक दिसताच.
भाजपचे नेते व कार्यकर्ते तोंड दाखवून पुन्हा गायब होत आहे. नगर शहरात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असली तरी भाजपचे उपनगरात मोठे वर्चस्व आहे. या उपनगरात भाजपचे नगरसेवक आहे. पण ते प्रचारात दिसत नाही. त्यामुळे शहरातील शिवसेनेचा उमेदवार अस्वस्त झाला आहे. ती स्थिती पारनरे, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारापासून ही मंडळी दूर आहेत.
पारनेरमध्ये तर विद्यमान शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात तिसरी आघाडी करून भाजपकडून बंडखोरीचा प्रयत्न सुरू होता. विशेष म्हणजे त्याला खासदार सुजय विखे यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे पारनेरमध्ये बंडखोरी अटळ झाली होती. परंतु थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष झातल्यानंतर बंडखोरांना तलवार म्यान करावी लागली. त्यासाठी खा. विखेंची चांगलीच पळपळ झाली.
अर्थात ती केली नसती तर त्यांचे परिणाम देखील भोगावे लागले असते. त्यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी युतीचा प्रचार करण्याचे ठरविले. पण आ. औटींचा स्वभाव व त्यांच्याकडून नेते व कार्यकर्त्यांनी दिली जाणारी वागणूक पाहता भाजपचे नेते व कार्यकर्ते वरवरच प्रचार करीत आहे. त्यांची ताकद विरोधकांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे दिसत आहे.
श्रीरामपूर व संगमनेरमध्ये पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते आजही बाजूला आहे. वर्षानुवर्ष स्थानिक नेतृत्वाविरोधात संघर्ष केला. आता त्या संघर्षाविरोधात लढण्याची संधी असतांना त्यांना डावलून अन्य लोकांना उमेदवारी दिली. त्यामुळे शिवसेनेचे स्थानिक नेते व कार्यकर्ते नाराज आहे. तसेच भाजपचे देखील नाराज आहे. त्याचा फटका शिवसेनेच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता आहे. भाजपने हात आखडता घेतल्याने शिवसेनेच्या उमेदवारांची चिंता आधिक वाढली आहे. भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनी लवकरात लवकरच सहभाग न घेतल्यास शिवसेना देखील तो पवित्रा भाजपच्या मतदारसंघात घेईल, असा इशारा देण्यात आला आहे.