लखनौ: भारतीय जनता पक्षाचे केंद्रातील आणि उत्तरप्रदेशातील सरकार केवळ हवाहवाई सरकार असून त्यात लोकांना प्रत्यक्षात काहींही मिळत नाही. केंद्र सरकारच्या वंदे भारत योजनेत त्यांना गरीब वंदनीय नसतात अशी टीका समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे.
उत्तरप्रदेशने देशाला राष्ट्रपती आणि पंतप्रधान दिले आहेत. त्याच उत्तरप्रदेशने गरीबांसाठी आपल्या सीमा सील केल्या आहेत. जर सीमाच खुल्या नसतील तर हे स्थलांतरीत मजुर उत्तरप्रदेशात कसे पोहचू शकतील आणि ते येथून आपल्या बिहार, ओडिशा, झारखंड, आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये कसे पोहचू शकतील असा सवाल त्यांनी केला. उत्तरप्रदेश सरकार स्थलांतरीत मजुरांना उत्तरप्रदेशात येऊ देत नाही आणि त्यांना रस्त्याने किंवा पायीही चालत जाऊ देत नाही.
त्यांना ट्रक किंवा दुचाकी वाहनातून प्रवास करण्यासही अनुमती दिली जात नाहीं अशी तक्रार त्यांनी केली आहे. अशा स्थितीत मजुरांनी हवाई मार्गान प्रवास करावा अशी त्यांची इच्छा दिसते आहे म्हणूनच हे सरकार हवाहवाई सरकार आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे. विदेशातील भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन राबवले जाते पण या सरकारसाठी देशातील स्थलांतरीत मजुर वंदनीय नसल्याने त्यांच्या नशिबी मात्र वनवासच येत आहे अशी टीकाही त्यांनी केली आहे.