नवी दिल्ली – कॉंग्रेसने (Congress) सोमवारी महागाईच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. त्यासाठी पक्षाच्या नेत्यांनी देशातील 22 शहरांत एकाच दिवशी पत्रकार परिषदा घेतल्या.
मोदी सरकारला (Modi Government) प्रामुख्याने महागाईच्या मुद्द्यावरून घेरण्याची रणनीती कॉंग्रेसने आखली आहे. त्यासाठी 4 सप्टेंबरला दिल्लीतील रामलीला मैदानावर विशेष सभेचे आयोजन पक्षाने केले आहे. त्या सभेसाठी दिल्ली चलोचे आवाहन पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषदांमधून केले.
मोदी सरकार (Modi Government) विरोधकांना शांत करण्यासाठी सीबीआय, ईडीचा गैरवापर करत आहे. मात्र, वाढती महागाई, अत्यावश्यक खाद्यान्नावर लादण्यात आलेला जीएसटी आदींविरोधात कॉंग्रेस सातत्याने आवाज उठवत राहील. केवळ केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापरावर फोकस असणाऱ्या सरकारला सामान्य जनतेची बिल्कूल काळजी नाही.
केंद्रात मोदी सरकार सत्तेवर आल्यापासून महागाईत भर पडण्याचे सत्र सुरूच आहे, असे टीकास्त्र कॉंग्रेसकडून सोडण्यात आले. निरर्थक मुद्द्यांवरून सत्ताधारी सातत्याने नवनवे वादंग निर्माण करतात. त्यामागे खऱ्या मुद्द्यांवरून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न आहे, असा आरोपही कॉंग्रेसने केला. (BJP government does not care about common people – Congress)