मेढा – कॉंग्रेस-राष्ट्रवादीकडे जनतेने कित्येक वर्षे सत्ता दिली मात्र या सरकारने फक्त लोकांची फसवणूक करण्याचे काम केले. आघाडी सरकारने सत्ता असतानाही अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. मात्र भाजप सरकारने हे प्रकल्प मार्गी लावल्याचे उदयनराजे यांनी सांगितले.
दरम्यान, सातारा-जावली मतदारसंघाचा विकास करण्यासाठी शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि मी एकत्र प्रयत्न करणार असल्याची ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली. लोकसभा पोटनिवडणुकीचे भाजपचे अधिकृत उमेदवार उदयनराजे भोसले व विधानसभेचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कुडाळ (ता. जावळी) येथील मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी आ. सदाशिव सपकाळ, माजी शिक्षण सभापती अमित कदम, माजी सभापती सुहास गिरी, जि. प. सदस्या सौ. अर्चनाताई रांजणे, विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे, पांडुरंग जवळ, रिपाईचे तालुकाध्यक्ष एकनाथ रोकडे, युवानेते ज्ञानदेव रांजणे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष बुवासाहेब पिसाळ, सुनील काटकर, बाळासाहेब गोसावी, कुडाळचे सरपंच विरेंद्र शिंदे, अशोकराव परामणे, शिवसेनेचे प्रशांत तरडे, सौरभ शिंदे, सुजित शिंदे, चंद्रसेन शिंदे, जयदीप शिंदे, नितीन शिंदे, शिवाजी जाधव, सयाजी शिंदे आदी उपस्थित होते.
उदयनराजे भोसले म्हणाले, कॉंग्रेस, राष्ट्रवादीची गेली कित्येक वर्षे या राज्यावर सत्ता होती मात्र त्यांनी अनेक प्रकल्प रखडवून ठेवले. लोकांचा केवळ मतासाठी वापर केला. अनेकांनी मोठी पदे भूषवली मात्र जिल्ह्याचा भरीव विकास झाला नाही. जावळी तालुक्यात पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करणार असून रोजगार निर्मितीला आपले प्राधान्य राहणार आहे. सातारा जिल्हा विकासात मागे कुणी ठेवला याचा विचार करून महायुतीला साथ द्या. मी कोणाला शत्रू मानत नाही, मी मांडतो तो विचार आणि तो लोकहिताच्या साठीच असतो. मी कोणाचे वाईट केले नाही म्हणूम कॉलर उडवतो.
शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, युवक व बेरोजगारांची आर्थिक उन्नती उंचावण्यासाठी जावलीत अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प होणे गरजेचे आहे. यासाठी आम्ही प्रयत्न करणार साहे. आम्ही दोघे आपणा सर्वांना बरोबर घेऊन विकासकामे करणार आहे. विरोधी उमेदवार पाच वर्षे सत्ताधाऱ्याबरोबर होते मग त्यांना विकास का करता आला नाही, असा सवाल शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला.
येथील बोंडारवाडी धरणासारखे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प भाजपच्या माध्यमातून तडीस नेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहे. तसेच कुसुंबी मार्गे रस्ता डांबरीकरण करून मेढा भाग हा कोयनेशी जोडल्याने लोकांच्या सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. सरकारच्या माध्यमातून पुढील पाच वर्षात उर्वरित विकासकामे करून मतदारसंघाचा विकास व प्रश्नांना प्राधान्य देऊ असे, आश्वासन उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यावेळी दिले.
माजी आ. सदाशिवभाऊ सपकाळ म्हणाले, मतदारसंघाच्या विकासासाठी व लोकांच्या प्रश्नासाठी दोन्ही राजे नेहमीच आपल्या बरोबर असून,जनतेच्या हितासाठी नेहमीच धडपडत आहेत. त्यांना मोठया मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी राजू गोळे, रामदास पार्टे, योगेश गोळे प्रकाश भोसले, सुरज गोळे, गोपाळराव बेलोसे, गीता लोखंडे, नितीन गावडे, समाधान पोफळे, एकनाथराव इंगळे, यशवंत पवार, रवींद्र परामणे आदी उपस्थित होते.