मुंबई – भारतीय जनता पक्षाने अनेक राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी नियुक्त केले आहेत. महाराष्ट्रातील दोन नेत्यांवर मोठ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. विनोद तावडे यांना बिहारसारख्या मोठ्या राज्याचे निवडणूक प्रभारी बनवण्यात आले आहे तर पंकजा मुंडे यांच्याकडे मध्य प्रदेशच्या सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
यापूर्वी विनोद तावडे यांची सरचिटणीसपदी नियुक्ती केल्यावर तावडे यांना राज्याच्या राजकारणातून दूर केले जात असल्याचे बोलले जात होते. तावडे केंद्रात गेल्यानंतर त्यांना हरियाणाचे प्रभारी बनवून आता बिहारसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी देण्यात आली आहे. बिहारमध्ये भाजपचे जुने मित्र नितीश कुमार पक्ष बदलून महाआघाडीत सामील झाले आहेत. त्यानंतर भाजपने तावडे यांना लोकसभेच्या 40 जागा असलेल्या बिहारचे प्रभारी बनवून मोठी जबाबदारी दिली आहे. तर माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांना केरळची तर राष्ट्रीय महिला आघाडीच्या माजी अध्यक्षा विजया रहाटकर यांच्याकडे राजस्थान प्रभारी पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
गेल्या वर्षी पंकजा मुंडे यांच्याकडे मध्यप्रदेशच्या प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली होती. आता त्यांना मध्य प्रदेशाचे सहप्रभारीपद देण्यात आले आहे. त्यांना पी मुरलीधर राव यांच्या नेतृत्वाखाली काम करावे लागेल. बिहारमध्ये, जेडीयुचे नितीश कुमार महाआघाडीत सामील झाल्यानंतर, भाजप आता येथे विरोधी भूमिकेत आहे. बिहारमध्ये स्वबळावर स्वत:ला मजबूत करण्यासाठी भाजपने संघटनेत फेरबदल सुरू केले आहेत. भूपेंद्र यादव केंद्रात मंत्री झाल्यानंतर राज्याचे प्रभारीपद रिक्त होते.
भाजपने विनोद तावडे यांना भाजपचे प्रभारी केले आहे. त्याचबरोबर हरीश द्विवेदी हे राज्याचे सहप्रभारी म्हणून कायम राहणार आहेत. यासोबतच नितीश सरकारमध्ये भाजप कोट्यातून आरोग्यमंत्री राहिलेल्या मंगल पांडे यांना भाजपने मोठी जबाबदारी दिली आहे. मंगल पांडे यांची पश्चिम बंगालचे राज्य प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या काही वर्षांपासून पंकजा मुंडे भाजप श्रेष्ठींवर नाराज आहेत. त्यांनी अनेकदा उघडपणे त्यांची नाराजी व्यक्त केली आहे. त्यानंतर आता त्यांची मध्यप्रदेश सहप्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आता त्यांची नाराजी दूर होणार की नाही याबाबत सध्या राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.