शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप; दत्त चौक येथे आंदोलन, सरकारविरोधी घोषणा
कराड – शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झालाच पाहजे, कर्जमाफी झालीच पाहिजे, या सरकारच करायच काय.. खाली मुंडी वर पाय..अशा घोषणा देत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप आक्रमक झाले. या सरकारने शेतकऱ्यांची फसवणुक केली आहे. त्यांच्या बेफीकीरीमुळे राज्यात महिलावरील अत्त्याचार वाढले आहेत. त्याच्या निषेधार्थ आज मंगळवारी भाजपच्यावतीने मंगळवारी धरणे आंदोलन केले. येथील दत्तचौकात सकाळी 11 वाजता या आंदोलनास प्रारंभ झाला.
भाजपाचा विश्वासघात करून कॉंग्रेस-राष्ट्रवादी बरोबर सत्ता स्थापन केलेल्या शिवसेनेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन अवकाळीग्रस्तांना 25 हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी 50 हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती.
देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काळजीवाहू सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 8 हजार रुपये एवढी मदत जाहीर केली होती. पुन्हा सत्तेत आल्यानंतर ही मदत आणखी वाढवू असेही त्या सरकारने जाहीर केले होते. या महाविकास आघाडी सरकारने अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 8 हजार रुपयांपेक्षा एक रुपयाचीही अधिक मदत दिलेली नाही. सरसकट कर्जमाफी करू, सातबारा कोरा करू अशा घोषणा करणाऱ्या महाविकास आघाडीने यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही.
महाआघाडी सरकारची कर्जमाफी योजनाही शेतकऱ्याची सरसकट फसवणूक करणारी आहे. महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची फक्त अल्पमुदतीची पिक कर्जे माफ केली आहेत. केवळ पीक कर्जाचा या कर्जमाफीत समावेश केल्याने बहसंख्य शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांबाबत महाविकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही.
भाजपा सरकारच्या कर्जमाफीत पिक कर्ज तसेच मध्यम मुदतीचे कर्ज समाविष्ट केले होते. पॉलीहाउस, शेडनेट, शेती उपकरणे, पशुपालन, शेळीपालन मधमाशीपालन अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. भाजपच्या व्यापक कर्जमाफीमळे 43 लाख खातेधारकांना 19 हजार कोटींचा व 10 हजार कोटींचा लाभ देण्यात आला होता. तूर खरेदीचे निकष जाणिवपूर्वक बदलण्यात आल्यामुळे जेथे 2017-18 मध्ये प्रति हेक्टरी 14.5 क्विंटल खरेदी होत होती.
तेथे आता 2019-20 मध्ये केवळ 8.46 क्विंटल प्रति हेक्टरी इतकीच खरेदी होत आहे. काही जिल्ह्यांमध्ये तर हे प्रमाण 3.6 क्विंटल इतके कमी करण्यात आले आहे. शेतकऱ्यांची घोर फसवणूक करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भारतीय जनता पार्टी तीव्र निषेध करीत आहे.
यावेळी विक्रम पावसकर, अतुल भोसले, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष एकनाथ बागडी, मुकूंद चरेगावकर, श्री पेंढारकर, सुदर्शन पाटस्कर, प्रमोद शिंदे, कराड दक्षिणचे धनाजी पाटील, संजय पवार, हरिश्चंद्र पाटील, रणजित पाटील, सागर लाखे, डॉ. शुभांगी गावडे, प्रशांत कुलकर्णी, सिमा घार्गे, स्वाती पिसाळ उपस्थित होते.