पुणे : गेल्या पाच वर्षात देवेंद्र फडणवीस यांनी दाखवलेला विकासाचा दृष्टीकोन, देश प्रथमचा नारा, काश्मिरमधून 370 कलम रद्द करणे आणि तिहेरी तलाकविरोधी कायदा या मुद्यावर भाजप शहरी मतदारांना सामोरे जाणार आहे. या मुद्यावर 288 पैकी शहरी 132 जागांवर विजय मिळवण्याचा राजकीय पंडितांचा मनसुबा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भाषणातून प्रचाराचा हा धागा सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी झाले आहे.
ग्रामीण भागात जलसिंचन, दुष्काळ, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, अन्न धान्याला आधारभूत किंमत देण्यात आलेले अपयश हे मुद्दे पक्षाच्या विरोधात जाऊ शकतात. त्यामुळे शहरी भागातील मतदारसंघावर भाजपाची मदार राहणार आहे. या 132 मतदार संघात भाजपाने विजय मिळवला तर सत्तेचा सोपान स्वबळाबवर चढता येणार आहे.
याचा गोष्टीचा विचार करून अमित शहा यांनी मुंबईतील मेळाव्यात जम्मू काश्मिर हा वादग्रस्त प्रदेश जाहीर केल्याबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावे टीकेची झोड उठवली. शेख अब्दुल्ला राजवटीत डॉ. शामाप्रसाद मुखर्जी यांच्यावर कारागृहात झालेल्या अत्याचारामुळेच त्यांचा कारागृहात मृत्यू झाल्याचा दावाही त्यांनी केला होता. 370 कलम रद्द करून काश्मिर देशाशी जोडला. ही आमची राष्ट्रभक्ती, असे ते मोठ्या उच्चारवाने म्हणाले.
विरोधकांनी यातील धोका ओळखून या मुद्याला बगल देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. चलनवाढीला देशभक्तीचे तर दुष्काळाला राष्ट्रप्रेमाचे कोंदणभाजप लावत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. भाजप 370चा मुद्द राज्या निवडणुकीत का आणत आहे? हे म्हणजे मोदी आणि शहा यांच्या वहीतून मुख्यमंत्री कॉपी करत असल्यासारखे आहे. शेती, जिवनावश्यक वस्तूंच्या आकाशाला भिडलेल्या किंमती, खड्डेमुक्त मुंबई यासारख्या महत्वाच्या गोष्टींसाठी फडणवीस सरकारने काहीच केले नसल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी केली.
राजकीय अभ्यासकांच्या मते, देशभक्तीचे कार्ड हे भाजपासाठी दुधारी तलवार ठरू शकते. लोकशाहीच्या भवितव्याच्या दृष्टीने ते काहीसे त्रासदायकही आहे.