ना. थोरात : फडणवीसांचे कोणतेच भाष्य खरे होत नाही; त्यांनी चांगला ज्योतीष शोधावा
नगर – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणत होते की, महाआघाडी सरकार सहा महिन्यांच्यावर टिकणार नाही. विधानसभेत 220 पेक्षा जास्त जागा येतील, विरोधी पक्षाला विरोधी पक्ष नेता निवडण्यायोग्य सुद्धा जागा येणार नाही. त्यामुळे फडणवीसांचे कोणतेच भाष्य खरे होत नाही. त्यांनी आता चांगला ज्योतिष शोधावा. तसेच त्यांनी पक्षात भरपूर आवक करून घेतली आहे. आता त्यांना सगळ्यांना संभाळण्याची जबाबदारी त्यांच्यावर असून, भाजपची अधोगती सुरु झाली असल्याचे दिसत आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.
ना. थोरात हे नगर येथील शासकीय विश्रामगृह येथे आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, भाजप सरकारच्या काळात विदर्भासह राज्यात अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. ही नेहमीच चिंतेची बाब राहिली आहे. फडणवीसांनी केवळ भाषणेच केली. त्यांनी कुठलीही कर्जमाफी दिली नाही. आमच्या काळात आत्महत्या कमी झाल्या होत्या. पण मध्यंतरी त्यात पुन्हा वाढ झाली, असली तरी आता महाविकास आघाडी कर्जमाफी आदी योजना राबवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न करत आहे. आरोप करायचा पिंड हा अनेक वर्षे विरोधातच राहिलेल्या भाजपचा राहिला आहे. आता पुन्हा ते विरोधात बसल्याने आम्ही केलेल्या चांगल्या कर्जमाफीला विरोध करत आहेत.
जवाहरला नेहरू विद्यापीठात जे घडले व तेथे विद्यार्थ्यांना मारहाण झाली, खरतर त्याचा निषेध देशातील सर्वच नागरिकांनी केला पाहिजे.तो लोकशाहीवर हल्ला असल्याचे मी मानतो. जवाहरलाल नेहरु विद्यापीठाचे वैशिष्ट्य वेगळे आहे. त्याला वैचारीक अशी वेगळी पार्श्वभूमी राहिली आहे. विशेषत: पुरोगामी विचारांचे मंथन सुरु असते. कन्हैयाकुमार सारखा गरीब कुटुंबातील मुलगा त्या विद्यापीठातून पुढे आला असल्याचे आपन सर्वजण पाहतो, असे वैचारीक मंथन कोणाला थांबावसे वाटत असेल, तर ती प्रक्रिया देशाच्या विकासासाठी घातक आहे. पुरोगामी विचारच देशाला पुढे घेवून जातात, असे मत थोरात यांनी व्यक्त केली.
सगळी पदे मला नको
माझ्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद आहे. त्याशिवाय कॉंग्रेस विधीमंडळ गटनेते पदही माझ्याकडे. त्याचबरोबर आणखी पाच सहा-छोटी मोठी पदांची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळे सगळी पदे मलाच मिळाली पाहिजे, अशी माझी भूमिका नाही. त्यामुळे आपल्याला पालकमंत्री पद नको असेही थोरात यांनी स्पष्ट केले.
जे पक्ष सोडून गेले, त्यांनी तिथेच राहवे
विधानासभा निवडणुकीत भाजपला पोषक असणाऱ्या वाऱ्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादीचे अनेक कार्यकर्ते भाजपमध्ये केले. मात्र हे वारे फिरल्याने भाजपच्या मातब्बरांना घरी बसावे लागले. तर काही मागे फिरण्याच्या विचारात आहेत. मात्र त्यांनी तेथेच राहवे असे थोरात यांनी म्हटले.