महिना लोटला तरी जिल्हाध्यक्ष निवांतच; कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम
नगर – भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती होवून महिना लोटला तरी अद्यापही या जिल्हाध्यक्षांना कार्यकारिणीला मुहूर्त सापडला नाही. जिल्हाध्यक्षांना कार्यकारिणीचा विसर पडला की काय अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. पक्षाच्या कोअर समितीची देखील महिन्याभरात बैठक झालेली नाही. त्यामुळे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत.
विरोधी पक्ष म्हणून भूमिका आता बजवायची असतांना पक्षाच्या नेत्यांकडून कोणतीही भूमिका घेतली जात नाही. अन् जिल्हाध्यक्ष देखील निंवात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांना पुढे काय असा प्रश्न पडला आहे.
गेल्या महिन्यात 13 जानेवारी रोजी भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली. यापूर्वी जिल्हाध्यक्ष निवडीसाठी नेते व कार्यकर्त्यांची एकत्रित बैठक बोलाविली होती. त्यात नगर दक्षिण, नगर उत्तर व नगर शहर या तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडीसाठी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या.
एकमत न झाल्याने कोअर समितीसह निवडणूक निरीक्षक आ. हरिभाऊ बागडे यांनी जिल्हाध्यक्ष निवडीचा निर्णय प्रदेशच्या कोर्टात पाठविला होता. प्रदेशपातळीवर चर्चा करून 13 जानेवारी रोजी नगर शहर जिल्हाध्यक्षपदी नगरसेवक महेंद्र गंधे, दक्षिणच्या जिल्हाध्यक्षपदी अरूण मुंडे तर उत्तर नगरच्या जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र गोंदकर यांची नियुक्ती करण्यात आली. या पदासाठी अनेक मातब्बर नेते इच्छुक असताना त्यांना बाजूला सारून प्रदेश नव्या चेहेऱ्यांना संधी दिली.
पक्ष संघटना वाढीबरोबर आगामी होणाऱ्या ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकीत पक्षाला चांगले यश कसे मिळले, या दृष्टीने आता जिल्हाध्यक्षांना नियोजन करावे लागणार आहे. पण नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या जिल्हाध्यक्षांचे जिल्ह्यात फारसे वलय नसल्याने आढळून आले आहे. नगर शहरात गंधे यांच्या नियुक्ती ठराविक नेते व कार्यकर्त्यांकडून स्वागत झाले असले तरी मुंडे व गोंदकर यांच्या नियुक्तीचे मात्र त्यांच्या खुद्द तालुक्यातील देखील फारसा उत्साह दिसला नाही. त्यामुळे या दोन्ही जिल्हाध्यक्षांच्या नियुक्तीबाबत नेते व कार्यकर्त्यांनी प्रतिक्रिया देण्याचे टाळले.
राज्यात सत्तांतर झाल्याने भाजपला आता विरोधी पक्ष म्हणून काम करावे लागणार आहे. अशावेळी जिल्हाध्यक्षांनी तातडीने कार्यकारिणी तयार करून जबाबदारीचे वाटप करणे आवश्यक होते. पण आज महिना झाला तरी कार्यकरिणी करण्यास मुहूर्त सापडला नाही. त्यात कोअर समितीची बैठक देखील महिन्याभरात झालेली नाही. दर महिन्याला ही बैठक घेण्याचे आदेश प्रदेशपातळीवरून देण्यात आले असतांना ही बैठक अद्यापही झालेली नहीा. त्यामुळे जिल्हाध्यक्षांनी कार्यकारिणी तयार करण्यास विलंब होत असल्याचे सांगण्यात आले आहे.नेते व प्रमुख कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करून ही कार्यकारिणी तयार करावी लागेल.