जालंधर: भारतीय जनता पक्षाला स्वबळावर बहुमत मिळणार नाही त्यामुळे त्यांना अन्य घटक पक्षांना बरोबर घेऊनच पुढील राजकारण करावे लागेल असे प्रतिपादन शिरोमणी अकालीदलाचे नेते नरेश आगरवाल यांनी केले आहे. ते म्हणाले की देशात कोणत्याच पक्षाला बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याने आता आघाडीचेच राजकारण सक्षमपणे करावे लागणार आहे. मी निवडणुकांचे अत्यंत वास्तववादी चित्र मांडतो आहे. त्यात मला कोणताही पक्ष बहुमताच्या जवळ जाताना दिसत नाही. तथापी एनडीएला यात वर्चस्व मिळेल असेही त्यांनी नमूद केले आहे. आगरवाल हे अकालीदलाचे राज्यसभा सदस्य आहेत. आणि ते भाजपचे मित्र आहेत.
भाजप किंवा एनडीएला स्वबळावर बहुमत मिळणार नसेल पण अन्य पक्षांच्या मदतीने ते सत्तेवर येणार असतील तर अशा वेळी भाजपचे नेतृत्व कोण करेल असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळले. ते म्हणाले की या विषयीचा निर्णय भारतीय जनता पक्षानेच घ्यायचा आहे. ते जे कोणालाही नेता निवडतील त्याच्याशी आम्ही सहकार्य करू अशी पुष्टीही त्यांनी जोडली. सदृढ लोकशाही साठी भाजपला आता एनडीएच्या घटक पक्षांना योग्य तो न्याय आणि सन्मान द्यावा लागेल अशी सुचनाहयी त्यांनी भाजपला केली. विरोधकांना शत्रु मानण्याची सध्याच्या राजकारणाची प्रथा चिंताजनक आहे असे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.