मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करावी, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे केली आहे. यावर ‘आम्ही अशा चौकश्यांना घाबरत नाही. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे.
‘राज्यातील भाजप नेत्यांनी अमित शहा यांच्याकडे अजित पवार यांच्या चौकशीची मागणी केली आहे. आता भाजप पक्षाचे नेते ठरवणार का? कोणाची चौकशी करायची, कुणाला दोषी ठरवायचे. महाराष्ट्रात बंगाल मॉडेल चालणार नाही. आम्ही घाबरत नाही, भाजपचे काही नेते अडचणीत येणार आहे. त्यामुळे भाजपकडून अशी मागणी केली जात आहे’, असेही मलिक म्हणाले.
भाजपच्या प्रदेश कार्यसमितीने या मंत्र्यांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीचा ठराव केला होता. त्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवले आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी दावा केला आहे. याआधीही भाजपच्या कार्यकारिणी बैठकीमध्ये अजित पवार आणि अनिल परब यांच्या सीबीआय चौकशीबद्दल ठराव मांडण्यात आला होता. भाजपच्या या भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.