निर्णय योग्य होता व आहे असे ठामपणे पिचड यांनी सांगताना मूळ प्रश्नाला बगल दिली.
शिवसेना, राष्ट्रवादी व कॉंग्रेस हे सत्तेसाठी एकत्र आले याविषयी काय सांगाल?
पूर्वी निवडणुका आल्या की, प्रत्येक गावात आपल्या गावातील विकासकामांविषयी चर्चा होत होती. सर्वजण एक विचार करून कोणाला मतदान करायचे हे ठरवीत असे. ही निवडणूक मात्र इन्स्टंट मुद्द्यावर झाली. शरद पवारांचे ईडी प्रकरण, साताऱ्यातील पाऊस, ह्या सर्व सहानुभूतीच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली. जे कधीही निवडून आले नसते त्यांची लॉटरी लागली. कोणत्याही विकासकामांच्या मुद्द्यावर ही निवडणूक झाली नाही.
मरगळलेल्या कॉंग्रेसलासुद्धा या सहानुभूतीने संजीवनी मिळाली, असे असून सुध्दा दोन्ही कॉंग्रेसला पाहिजे तेवढे यश मिळाले नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद पाहिजे होते, म्हणून त्यांनी भाजपची साथ सोडली. भाजप सेना पुन्हा युती झाली, तर आपल्याला परत संधी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने दोन्ही कॉंग्रेसने व शिवसेनेने आपल्या तत्वांना तिलांजली दिली. म्हणून हे सरकार स्थापन झाले, असा त्यांनी आरोप केला.
ठाकरे सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण होतील का?
दोन गोष्टी असतात. सत्तेत येताना सत्ताधारी वस्तुस्थिती मांडीत असतात. तर विरोधक सत्तेत येण्यासाठी कोणतीही आश्वासने देत असतात. नेमके इथेच मतदार आपल्या फायद्यासाठी वस्तुस्थितीला धरून नसलेल्या आश्वासनाच्या मागे जातात. उदाहरण द्यायचे ठरले, तर कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस सरसकट कर्जमाफी करणार, सात बारा कोरा करणार, अनेक विकास कामे पूर्ण करू असे म्हणत होते. सत्तेत येऊनही दोन लाख रूपये कर्जमाफी करण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसले.
आता फक्त याद्या तयार होतील. सदर कर्जमाफीला व विकास कामांना निधी देण्यासाठी मार्च महिन्यातील अधिवेशनात त्याला मंजुरी देतील.नंतर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तीन महिने लागतील. तो पर्यंत पावसाळा येईल. पावसामुळे विकास करणे मागे राहील व दिवाळी नंतर त्यावर अंमलबजावणी होईल. म्हणजे यासाठी एक वर्ष जाणार आहे. परंतु जनतेला आता इन्स्टंट पाहिजे, जनता इतके दिवस वाट पाहू शकत नाही.हळूहळू जनतेची फसवणूक झाल्याचे लक्षात येईल, असे मतही पिचड यांनी व्यक्त केले.
हे सरकार एकमताने, एका विचाराने चालेल का?
सध्या तरी या तिन्ही पक्षापुढे कोणताही पर्याय नाही. तिघांनाही नाईलाजाने आपला स्वाभिमान, अभिमान बाजूला ठेवावा लागणार आहे.
संगमनेर ते बारी हा रस्ता खराब का?
राजूर गावाचा विकास माझी आई सरपंच झाल्यानंतर त्यांनी राजूर गावाच्या विकासात लक्ष घातले. ही कामे साधारणतः 2005 पासूनच सुरू झाली होती. 2014 च्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर मी प्रथम संगमनेर ते बारी या राज्यमार्गाच्या रस्त्याला मंजुरी आणली. परंतु विरोधात असल्याने रस्त्याचे काम सुरू होऊ शकले नाही. मी भाजपत प्रवेश केल्यानंतर या रस्त्याचे काम सुरू झाले आहे. दुतर्फा रस्त्याचे काम होणार आहे.त्यामुळे जनतेचा त्रास कमी होणार आहे.
ठाकरे सरकार कार्यकाल पूर्ण करील काय?
तिन्ही पक्षाच्या नेत्यांचा स्वभाव लक्षात घेता, हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण करील का नाही? हे भाकीत करणे अवघड आहे. मात्र सध्याचे ठाकरे सरकार हे आपला कार्यकाल पूर्ण करील किंवा नाही हे मार्चनंतरच कळेल, असे मत पिचड यांनी व्यक्त केले.