पुणे – महापालिकेतील पक्षाच्या कामाची गती वाढविण्यासाठी तसेच कामकाजावर लक्ष ठेवण्यासाठी प्रदेश भाजपकडून 5 सदस्यांची समिती नेमली आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाची पुण्यात झालेल्या पिछेहाटीला महापालिकेचा कारभार जबाबदार असल्याचा निष्कर्ष पक्षाकडून काढला आहे. त्यामुळे दोन वर्षांवर येऊन ठेपलेल्या पालिका निवडणुकीपूर्वी पक्षाची प्रतिमा सुधारणे तसेच पक्षाने दिलेली आश्वासने पूर्ण करण्याची जबाबदारी या समितीवर असणार आहे.
या समितीत महापौर मुरलीधर मोहोळ, विद्यमान स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे, विद्यमान सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृहनेते श्रीनाथ भिमाले तसेच स्थायी समितीचे भाजपचे उमेदवार हेमंत रासने या ज्येष्ठ नगरसेवकांचा समावेश असल्याची माहिती पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडून देण्यात आली.
अवघ्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या खासदाराला पुण्यातून विक्रमी बहुमत मिळाले, मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मात्र पक्षाला चांगलाच धक्का बसला असून शहरातील 8 मधील 2 जागा गमवाव्या लागल्या आहेत. तर 2 जागांवर पक्षाचे उमेदवार 3 हजारांपेक्षा कमी मताधिक्याने निवडून आले आहेत. पक्षाच्या या वाताहतीला महापालिकेतील कारभारच जबाबदार असल्याचे सांगत, पक्षाकडून वरिष्ठ पदाधिकाऱ्यांवर आगपाखड केली आहे. त्यानंतर या पदाधिकाऱ्यांनी महापालिका प्रशासनाला या अधोगतीला जबाबदार धरत, नगरसेवकांची कामे होत नाहीत, प्रकल्प वेळेत मार्गी लागत नाहीत असे सुनावत प्रशासनावर या पराभवाचे खापर फोडले. त्यामुळे महापालिका निवडणुकीपर्यंत अशीच स्थिती कायम राहिल्यास पक्षाला पालिकेतील सत्ताही गमावण्याची भीती आहे.
2 वॉर्डच्या प्रभागाची नगरसेवकांमध्ये धास्ती
राज्यात सत्ताबद्दल झाल्याने 2022 मध्ये होणाऱ्या पालिका निवडणुका 4 वॉर्डचा एक प्रभाग न होता. प्रत्येकी 2 वॉर्डच्या प्रभागात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक नगरसेवक आतापासूनच धास्तावले आहेत. त्यामुळे महापालिकेतील कारभार सुधारून पक्षात पडलेले गटतट बाजूला ठेवण्यासाठी तसेच महापालिकेतील पक्षाचा कारभार सुधारण्यासाठी पक्षाकडून ही कोअर कमिटी नेमली असून त्यांच्यावरच आता पालिका निवडणुकीपर्यंतची सर्व जबाबदारी असणार आहे.