नवी दिल्ली – लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिका दौऱ्यात निवडणूक आयोगावर निशाणा साधला. त्यांनी परदेशात भूमिका मांडल्यावरून भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार शाब्दिक खडाजंगी झाली. भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल यांच्यावर टीकेची झोड उठवली. राहुल यांनी परदेशी भूमीतून भारतीय लोकशाही आणि भारतीय संस्थांचा अवमान केला. ईडीने नॅशनल हेराल्ड प्रकरणी कारवाईचे पाऊल उचलले. त्याचा राग राहुल निवडणूक आयोगावर काढत आहेत.
मात्र, त्याने काहीच साध्य होणार नाही. ईडीसारख्या केंद्रीय यंत्रणा वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई करतात. नॅशनल हेराल्ड प्रकरण भ्रष्टाचाराशी संबंधित आहे. त्या प्रकरणात कोट्यवधी रूपये लुटण्यात आले. त्यामुळे राहुल आणि त्यांच्या मातोश्री सोनिया गांधी यांना कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा पात्रा यांनी दिला. राहुल जेव्हा परदेशात जातात; तेव्हा भारताविषयी द्वेषयुक्त विचार मांडण्याची संधी सोडत नाहीत, असा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते धर्मेंद्र प्रधान यांनीही केला.
कॉंग्रेसच्या गोटातूनही भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. आजच्या काळात कोण जगाच्या कुठल्या भागातून बोलतो हा मुद्दा होऊ शकत नाही. परदेशी भूमीत देशातील राजकीय मुद्द्यांवर बोलणे आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शिकलो, असा शाब्दिक टोला कॉंग्रेसचे नेते पवन खेडा यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत लगावला.
निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीविषयी आम्हाला साशंकता आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नांवर आयोगाने उत्तर द्यायला हवे. त्यासाठी भाजप का पुढे येतोय, असा उपरोधिक सवालही त्यांनी केला. कॉंग्रेसच्या नेत्या कुमारी शैलजा यांनीही मध्यप्रदेशात पत्रकारांशी बोलताना राहुल यांचे समर्थन केले. सार्वजनिक झालेल्या मुद्द्यांवरच राहुल बोलले, असे त्या म्हणाल्या.