कॉंग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांची भाजपवर गंभीर आरोप
मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आता झाला आहे. यात 36 मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. कॉंग्रेसकडून अस्लम शेख यांनीही पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. परंतु, शेख यांनी शपथ घेतल्यानंतर काही तासांतच भाजपने त्यांच्याविरोधात रान उठवले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा आरोपी याकूब मेमनच्या फाशीला विरोध केल्याचा आरोप अस्लम शेख यांच्यावर भाजप करत आहे. दरम्यान, अस्लम शेख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळले आहेत. माझा याकूब मेमनच्या फाशीला नव्हे तर भारतातून फाशीची शिक्षाच रद्दबातल व्हावी यासाठी विरोध होता. भाजपने पहिल्यांदा माझी सही असलेली याचिका वाचायला हवा होता, असे त्यांनी म्हटले. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.
त्या निवेदनावर शत्रुघ्न सिन्हा यांचीही सही होती, भाजपने त्यावेळी त्यांनाही हाच प्रश्न विचारायला हवा होता. त्याच्यावर भारताच्या माजी सरन्यायाधीशांनीही स्वाक्षरी केली होती, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, माझ्यावर आरोप करणारेच देशद्रोही आहेत. देशाला तोडण्याचे काम इंग्रज करु शकले नाहीत. ते काम भाजप करत आहे. ती याचिका देशातून फाशीची शिक्षा रद्द करण्याची होती. नथुराम गोडसे यांची मंदिरे बांधणारी ही लोकं आहेत, असा आरोप त्यांनी भाजपवर केला.
गेल्या सहा वर्षांपासून भाजपचे हेच काम सुरु आहे. आता ते विरोधात असल्याने कोणताही मुद्दा काढत असल्याची टीकाही त्यांनी केली. अस्लम शेख हे मुंबईतील मालाड पश्चिम मतदारसंघाचे आमदार आहेत. 2009 पासून सलग तीनवेळा ते विधानसभेवर निवडून आले आहेत. पूर्वी ते समाजवादी पक्षात होते.