मुंबई – भारतीय जनता पार्टी हा क्रूर आणि लोकशाहीविरोधी पक्ष आहे. त्यांनी अनेकांवर नाहक कारवाई करून राजकीय दहशत बसवली आहे. अभिनेते शाहरूख खानवरही अशीच चुकीची कारवाई त्यांनी केली आहे असा आरोपही ममतांनी केला.
ममता बॅनर्जी सध्या आपल्या पक्षाचा पाया विस्तारण्यासाठी देशाच्या विविध भागाचा दौरा करीत आहेत. आज त्यांनी मुंबईत एक जाहीर कार्यक्रम केला. त्या कार्यक्रमाला मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते, हायकोर्टाचे माजी न्यायाधीश आणि सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.
त्या म्हणाल्या की, भारताचे मॅनपॉवरवर प्रेम आहे, त्यांना मसल पॉवर नको असते. भाजपच्या राजवटीत आपण अत्यंत क्रूरपणाचे अनुभव घेत आहोत. त्यांच्या विरोधात एकत्रितपणे आपण लढा दिला तर आपण सहज जिंकू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
या कार्यक्रमाला दिग्दर्शक महेश भट हेही उपस्थित होते. त्यांना उद्देशून त्या म्हणाल्या, चित्रपटसृष्टीतील अनेकांना या राजवटीचा त्रास सहन करावा लागला आहे. तुम्हालाही शाहरूख खानप्रमाणेच त्रास सहन करावा लागला आहे. पण जर आपल्याला जिंकायचे असेल आणि हा त्रास मोडून काढायचा असेल तर आपल्याला एकत्रित लढावे लागेल. आम्हाला तुम्ही मार्गदर्शन करा, असे आवाहनही त्यांनी केले.
त्यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला हायकोर्टाचे माजी न्यायाधीश शफी परकार आणि अभय ठिपसे, सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, तिस्ता सेटलवाड, मेधा पाटकर, माजी कॉंग्रेस नेते संजय झा, सुधिंद्र कुलकणी, अभिनेते शत्रुघ्न सिन्हा, शोभा डे, स्वरा भास्कर, राहुल बोस, कोंकणा शर्मा आदी उपस्थित होते.