नवी दिल्ली : पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटीच्या प्रकरणामुळे आता देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. भाजप आणि काँग्रेस यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरूच असताना भाजपच्या नेत्यांनी देशभर मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप केला. दिल्ली, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांत असे विधी आयोजित करून भाजप नेत्यांनी मोदींच्या दीर्घायुष्याची कामना केली.
पंजाबमधील भटिंडाहून फिरोजपूर येथे जाताना पुलावर आंदोलकांनी बुधवारी ताफा रोखल्याने मोदी १५-२० मिनिटे अडकून पडले होते. पंजाब पोलिसांकडून पंतप्रधानांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याने मोदींचा ताफा पुन्हा भटिंडा विमानतळावर परतल्याचा आरोप केंद्राने केला.
मोदींना शारीरिक इजा करण्याचे काँग्रेसचे कारस्थान असल्याचा आरोप भाजपने केला असला तरी, मोदींच्या जीवाला धोका नव्हता व सुरक्षेतही त्रुटी नव्हती, असा दावा पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांनी केला आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद भाजपमध्ये गुरुवारी उमटले. पक्षाने मोदींच्या दीर्घायुष्यासाठी महामृत्युंजय जप करण्याचे ठरवले. प्रदेश भाजपमधील नेत्यांना महामृत्यूंजय जपाचे आयोजन करण्यास सांगण्यात आल्याचे समजते. त्यानुसार मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी गुरुवारी भोपाळमध्ये गुफा मंदिरात महामृत्युंजय जप केला. राज्यभरातील मोठ्या शिवमंदिरात हा जप केला जाणार असून, दोन ज्योतिर्लिग महाकालेश्वर व ओमकारेश्वर येथेही महामृत्जुंय जप केला जाणार आहे.
दिल्लीतही ठिकठिकाणी मंत्रपठण करण्यात आले. झेंडेवाला माता मंदिरात भाजपचे नेते जय पांडा, प्रीत विहारमधील दुर्गा मंदिरामध्ये पक्षाचे महासचिव अरुण सिंह, कॅनॉट प्लेस येथील हनुमान मंदिरात महासचिव दुष्यंत गौतम आदी नेत्यांनीही मंत्रपठनाचे आयोजन केल्याची माहिती भाजपच्या माध्यम विभागाने दिली़ त्रिपुराची राजधानी अगरतळामध्ये शुक्रवारी मुख्यमंत्री बिप्लब देव हेही धार्मिक विधीमध्ये सहभागी होणार आहेत. मोदींचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीमध्ये कालभैरव मंदिरातही महामृत्युंजय जप करण्यात येणार आहे.
लोकशाही व्यवस्थेमध्ये पंतप्रधान ही केवळ व्यक्ती नसते तर, संस्था असते. ही संस्था कमकुवत होणे लोकशाहीसाठी योग्य नाही, असे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. काँग्रेसची सत्ता असलेल्या पंजाबमध्ये मोदींच्या सुरक्षेत त्रुटी राहिली. त्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांनी मोदींबद्दल अनुद्गार काढले. मतदारांनी काँग्रेसला माफ करू नये, असे आवाहन राजनाथ यांनी उत्तराखंडमधील जाहीर सभेत केले.