कोलकाता – भारतीय जनता पार्टी केवळ तृणमूल कॉंग्रेसमधील भ्रष्टाचारी नेत्यांना विकत घेऊ शकते. मात्र, तृणमूल कॉंग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते विकले जाणार नाहीत, असे वक्तव्य पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केले आहे. तृणमूल कॉंग्रेसमध्ये भ्रष्टाचारी नेत्यांना स्थान नाही. त्यामुळे ज्यांना आमच्या पक्षातून बाहेर पडायचे आहे त्यांनी तातडीने निघावे, असेही ममता बॅनर्जी यांनी सांगितले.
पश्चिम बंगालमध्ये लवकरच विधानसभा निवडणूक होणार आहे. त्यासाठी भाजपने ताकद पणाला लावली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये भाजपने सुवेंदू अधिकारी यांच्यासह तृणमूल कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांना गळाला लावले आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर तृणमूल कॉंग्रेस खिळखिळी होताना दिसत आहे.
निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतसं पश्चिम बंगालमधील राजकीय वातावरणही तापू लागलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. दोनच दिवसांपूर्वी टीएमसीचे आमदार दीपक हल्दर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. टीएमसीसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे.
दीपक हल्दर हे डायमंड हार्बर येथील आमदार आहेत. त्यांनी सोमवारी ममता बॅनर्जी यांच्याकडे पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पक्षांतर्गत कुरबुरीतून त्यांनी राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं. टीएमसीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर हल्दर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. गेल्या 46 दिवसांत तृणमूलच्या 11 बड्या नेत्यांनी पक्षाला रामराम करत भाजपची वाट धरली आहे.