पाटणा – बिहारमध्ये काल महागठबंधन सरकार स्थापन झाले असून या सरकारमधील उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आता भारतीय जनता पार्टीवर हल्लाबोल सुरू केला आहे. बिहारच्या जनतेची आम्हालाच सत्तेत बघण्याची इच्छा होती व आम्ही सत्तेवर आलो आहोत असे तेजस्वी यांनी म्हटले आहे.
तेजस्वी म्हणाले की, आज स्थिती अशी आहे की हिंदी भाषिक पट्ट्यात भारतीय जनता पार्टीचा एकही सहयोगी पक्ष राहिलेला नाही. जो विकला जातो त्याला विकत घेणे आणि जो घाबरतो त्याला घाबरवणे एवढेच काम भाजप करते आहे. बिहारच्या जनतेला हे माहिती आहे. केवळ त्यांनाच नाही तर देशातल्या प्रत्येक राज्यातील जनतेला हे माहिती आहे.
ज्या ज्या पक्षांशी त्यांनी युती केली त्या सगळ्या पक्षांना त्यांनी संपवले. इतिहास याचा साक्षीदार आहे. पंजाब आणि महाराष्ट्रात काय झाले हे सगळ्यांनी पाहिले आहे. नितीश कुमार देशातले सगळ्यांत अनुभवी मुख्यमंत्री आहेत. त्यांनी भाजपची साथ सोडल्याबद्दल त्यांचे अभिनंदन. मात्र, नितीश यांच्यावरही भाजपचा भरपूर दबाव होता. आता आम्ही त्यांना महागठबंधनचा नेता निवडले आहे.
ते पुढे म्हणाले की, काही दिवसांपूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याची घोषणा केली होती. लोकांना विकत घेणे आणि घाबरवणे या दोनच गोष्टी त्यांना माहीत आहेत. त्यांचा अजेंडा आम्ही बिहारमध्ये लागू होऊ देणार नाही. लालकृष्ण आडवाणी यांची रथयात्रा लालूप्रसाद यादव यांनी बिहारमध्ये कशी रोखली होती, हे सगळ्यांनी पाहिले आहे. त्यांना घाबरून आम्ही माघार घेणार नाही.