कोलकता -देशातील इतर राज्यांप्रमाणेच पश्चिम बंगालमधील करोनाबाधितांची संख्याही वाढू लागली आहे. मात्र, त्याचा ठपका मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपवर ठेवला आहे. भाजपने प्रचारासाठी मोठ्या संख्येने बाहेरच्यांना आणून बंगालमधील करोना फैलाव वाढवला, असे त्यांनी म्हटले आहे.
जलपाईगुडीमधील प्रचार सभेत बोलताना ममतांनी भाजपवर टीकेची झोड उठवली. त्यासाठी त्यांनी करोना संकटाचाही आधार घेतला. बंगालमधील करोना फैलावावर नियंत्रण मिळवण्यात आम्ही यश मिळवले होते. मात्र, भाजपने स्थिती आणखी बिकट करून टाकली. भाजप हा धोकादायक पक्ष आहे. तो पक्ष बंगालचे विभाजन करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असा आरोपही त्यांनी केला.
बंगाल विधानसभा निवडणुकीतील निम्म्या टप्प्यांत आतापर्यंत 294 पैकी 135 जागांसाठी मतदान झाले आहे. त्याचा संदर्भ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका सभेत भाजपने आताच 100 जागा जिंकल्या असल्याचा विश्वास व्यक्त केला. त्या दाव्याची ममतांनी खिल्ली उडवली. बंगालमधील सर्व टप्प्यांत मिळून भाजपला 70 जागाही मिळणार नाहीत, असे त्या म्हणाल्या.