रायगड: विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी भाजपची डोकेदुखी वाढताना दिसत आहे. एकीकडे बंडखोरी शमवण्याचे आव्हान असतानाच आता पदाधिकारीही पक्षांतर करत असल्याचे दिसत आहे.
भाजपचे सुधागड तालुका अध्यक्ष राजेंद्र राऊत यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह आज शेतकरी कामगार पक्षामध्ये (शेकाप) प्रवेश केला. शेकाप आमदार धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत हा जाहीर प्रवेश झाला.
राऊत यांच्या पक्षांतरामुळे पेण विधानसभा मतदारसंघात भाजपला फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचा निवडणुकीच्या निकालावरही किती परिणाम होणार हे मात्र येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.
भाजपचे पेण-पाली विधानसभा मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री रवी पाटील भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे पेण-सुधागड मतदारसंघातील भाजपचे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत याचा थेट फटका रवी पाटील यांना बसण्याची शक्यता आहे.