पाटणा – केंद्रिय मंत्री नीर्मला सीतारामन यांनी भारतीय जनता पक्षाचा बिहार विधानसभा निवडणुकीसाठीचा जाहीरनामा आज जाहीर करताच कॉंग्रेसने या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे. या जाहीरनाम्यातले पहिलेच कलम हे बिहारी जनतेला कोव्हिड-19 प्रतिबंधक लस मोफत देण्याचा वायदा केला आहे.
त्यावर कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि माजी केंद्रिय मंत्री शशी थरूर यांनी जोरदार हल्ला चढवताना म्हटले आहे की, बिहारमध्ये भाजपाचे धोरण हे “तुम मुझे व्होट दो, मै तुम्हे वॅक्सिन दूंगा; या चालीवरचे आहे. निवडणुका जिंकण्यासाठी कोणत्याही नीचतम स्तराला जाण्याची भाजपाची तयारी असल्याचेच यातून दिसून येत असून, बिहारी जनतेने सावध राहण्याची गरज आहे, असे थरूर म्हणाले.
बिहारमधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी भाजपाने आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला. इतर अनेक आश्वासनांपैकी यंदा भाजपाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील जनतेला कोरोनाचा मोफत लस देण्यात येईल असं आश्वासनही आपल्या जाहीरमान्यात दिलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवारी बिहार निवडणुकीसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. मात्र, करोना लस मोफत देण्याचे आश्वासन भाजपाच्या अंगाशी येत असल्याचे दिसून येत आहे. या आश्वासनानंतर देशभरातून भाजपावर टीकेची झोडस् उठवली जात आहे.
क़ॉंग्रेस नेते शशी थरूर यांच्यानंतर शिवसेना नेत्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही भाजपाच्या घोषणेवर टीका करताना म्हटले आहे की, करोना विषाणुविरोधातील लस अद्याप आलेली नसताना त्या विषयावरुन मते मागणे भाजपाला शोभणारे नाही.
शिवाय, केंद्रात सत्तेत असलेले भाजपाचे सरकार सर्वच देशवासियांप्रती उत्तरदायी असल्याने, त्यांनी केवळ बिहारी जनतेला असे आश्वासन देणे म्हणजे, अन्य राज्यांतील भारतीय नागरिकांचा अवमान नव्हे का?