नवी दिल्ली – भाजपने अपना दल आणि निषाद पक्षासोबत उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, जागावाटपाचा निर्णय अद्याप अधांतरी लटकला आहे.
भाजपाध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, यूपीचे प्रभारी धर्मेद्र प्रधान आणि अपना दल तसेच निषाद पक्षाच्या नेत्यांसोबत पत्रकारांशी संबोधित करतना भाजपने युतीची घोषणा केली. मात्र, जागावाटपाबाबत कोणताही निर्णय होवू शकला नाही. तिन्ही पक्षाची युती 403 जागांसाठी झाली आहे.
अपना दल आणि निषाद पक्षाने जादा जागा मिळविण्यासाठी नव्हे तर निवडणूक जिंकण्यासाठी युती केली असल्याचे मत अनुप्रिया पटेल आणि संजय निषाद यांनी व्यक्त केले आहे. जागावाटपाबाबत चर्चा सुरू असून लवकरच यावर अंतिम निर्णय घेण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अनुप्रिया पटेल म्हणाल्या, अपना दल 2014पासून भाजपसोबत लढत आहे. आतापर्यंत 2014, 2017 आणि 2019 अशा तीन निवडणुका एकत्रित लढल्या आहेत. यूपी आणि केंद्रातील डबल इंजीनच्या सरकारने यूपीचा विकास वेगाने केला आहे. एवढेच नव्हे तर, सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुध्दा रूढ झाली असल्याचे त्यांनी सांगितले.