इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान पाकव्याप्त काश्मीरमधील (POK) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित सभेत म्हणाले, भाजप आणि आरएसएसची विचारसरणी स्वतः भारतासाठी धोकादायक आहे. कारण ही विचारसरणी केवळ मुस्लीम नाही, तर शिख, ख्रिश्चन आणि अनुसुचित जातींना देखील लक्ष्य करते. ते त्यांनाही समान नागरिक मानत नाहीत. यावेळी त्यांनी स्वतःला आंतरराष्ट्रीय मंचावरील काश्मीरी लोकांचा‘ब्रँड अॅम्बेसिडर’ म्हटलं.
या सभेत इम्रान खान यांनी जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवण्याच्या भारताच्या निर्णयाचाही विरोध केला. जम्मू काश्मीरमधील कलम 370 हटवल्यानंतर 5 ऑगस्ट 2019 पासून काश्मीरमध्ये ‘अत्याचारात’ वाढ झालीय. या संघर्षात पाकिस्तान काश्मिरी लोकांच्या सोबत उभा आहे, असंही इम्रान खान म्हणाले.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये 25 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इम्रान खान यांनी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक दावे केले. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडत असल्याची परिस्थिती असताना आणि कर्जाचा डोंगर तयार झालेला असतानाही त्यांनी पाकिस्तानमधील तहरीक-ए-इंसाफ पक्षाच्या आर्थिक धोरणांबद्दल स्वतःची पाठ थोपटवून घेतली.
तसेच कुराणचा आधार घेत मी जगभरातील काश्मीरी लोकांचा मुद्दा मांडत राहिल असं सांगितलं. याआधी इम्रान खान यांनी अफगाणिस्तानमधील हिंसेत झालेली वाढ आणि पाकिस्तानकडून तालिबान्यांना होणाऱ्या मदतीच्या आरोपांचं खंडन केलं. तसेच यासाठी पाकिस्तानला दोष देणं योग्य नसल्याचं म्हटलं.