मुंबई – शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. येत्या २-३ दिवसांमध्ये मंत्रिमंडळ विस्तार केला जाऊ शकतो अशी राजकीय वर्तुळातमध्ये जोरदार चर्चा आहे. तत्पूर्वी रामटेकचे आमदार आशिष जयस्वाल यांना मंत्रिपद मिळू नये म्हणून भाजप कार्यकर्त्यानेच कंबर कसली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून या भ्रष्टाचारी आमदाराला मंत्रीपद देऊ नका अशी मागणी करणार असल्याचे देखील युवा कार्यकर्त्याने स्पष्ट केले.
दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणविसांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर कोणाला मंत्रिपद मिळणार याबाबत जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. अशात भाजपच्या ग्रामविकास आघाडीचे जिल्हाध्यक्ष व रामटेक विधानसभा क्षेत्राचे प्रभारी डॉ. राजेश ठाकरे यांनीं आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत त्यांना मंत्रिपद न देण्याची मागणी केली. पत्रकार परिषदेच्या माध्यमातून डॉ.ठाकरे यांनी ही मागणी केली.
पत्रकार परिषदेत डॉ. ठाकरेंनी जयस्वाल यांच्यावर केले हे आरोप
जयस्वाल हे भ्रष्टाचारी असून खनिज महामंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी वाळू विक्रीत १५० कोटींचा भ्रष्टाचार केला आहे.
लोहकरे हत्याकांड आणि साठवणे हत्याकांडाचेही धागेदोरे जयस्वाल यांच्याशी जुळत असल्याचा आरोप करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी देखील केले होते जयस्वालांवर ३०० कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप.
त्यावेळेसचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याबाबतची चौकशी बंद केल्याचे देखील डॉ. ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
जयस्वाल यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी ईडी आणि सीबीआयद्वारे करण्यात यावी.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याकडे जयस्वाल यांनी केलेल्या भ्रष्टाराची सर्व कागदपत्रे पुराव्यासह पाठविणार आहे. त्यांना पत्र लिहून जयस्वाल यांना शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मंत्रीपद देऊ नये, अशी मागणी करणार असल्याचे देखील डॉ.ठाकरे यांनी सांगितले.