मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या अधिक झपाट्याने वाढताना दिसत आहे. कोरोनाचे सावट गडद होत असतानाच भाजप व एमआयएमने राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २४ मार्च रोजी संपूर्ण लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय जाहीर केला होता. यानंतरच्या टप्प्यांमध्ये सरकारने खबरदारी बाळगत बहुतांश आस्थापना पुन्हा सुरु केल्या आहेत. मात्र लॉक डाऊनच्या पहिल्या टप्प्यापासून धार्मिक स्थळे अद्यापही खुली करण्यात आलेली नाहीत.
याच पार्श्वभूमीवर आता भाजप व एमआयएम या दोन्ही पक्षांतर्फे धार्मिक स्थळे उघडण्याची स्वतंत्र मागणी करण्यात आली आहे.
याबाबत बोलताना भाजपचे प्रदशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंदिरे न उघडल्यास २९ ऑगस्टपासून राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.
“महाराष्ट्रातील अनेक संघटना व नागरिकांनी राज्य सरकारकडे मंदिरे उघडण्यासंदर्भात मागणी केली आहे. मात्र महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार याबाबत निर्णय घ्यायला तयार नाही.” असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, याबाबत बोलताना एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी देखील मशिदी उघडण्यात याव्यात अशी मागणी केली आहे. ते म्हणतात, “एकीकडे मंदिरे आणि मशिदी खुल्या केल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे दुकाने, लग्न समारंभ इत्यादींना परवानगी दिली जातीये. हे स्वीकारहार्य नाही.”
“राज्य सरकारने परवानगी दिली नसली तरी मी २ सप्टेंबर रोजी प्रार्थनेसाठी मशीद खुली करणार आहे. हिंदूंनीही त्यांची धार्मिक स्थळे १ सप्टेंबररोजी खुली करावीत.” असं आवाहनही जलील यांनी केलं.
असं असलं तरी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मात्र धार्मिक स्थळे उघडण्याबाबत थोडी वेगळी घेतली आहे. मध्यंतरी नाशिक येथील पुजाऱ्यांचे एक शिष्टमंडळ राज ठाकरे यांच्या भेटीस आले असता त्यांनी, मंदिर परत उघडण्यासाठी मंदिर प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे का हे जाणून घेतल्याविना या मागणीस पाठिंबा देणार नसल्याचं म्हंटल होत.