मुंबई : पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर सहा वाहनांचा विचित्र अपघात झाला झाल्याची घटना घडली आहे. एका ट्रकने धडक दिल्याने हा अपघात घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात एका गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गाने जाणारे इतर प्रवासी आणि स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर तातडीने खंडाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यासाठी पुढे आलेल्या नागरिकांनी अपघातग्रस्तांना गाड्यांमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी ट्रकने उडवलेल्या मोटारीमधील तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड गोंधळ बघायला मिळाला. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी जमली होती.
पुणे-बंगळुरु महामार्गावर अपघातग्रस्त गाड्या या साताऱ्याहून पुण्याच्या दिशेला जात होत्या. यावेळी एका भरधाव ट्रकने सहा गाड्यांना धडक दिली. त्यामुळे हा विचित्र आणि भीषण अपघात झाला. या अपघातात वॅगनार कार चक्काचूर झाली आहे. तसेच इतर गाड्यांचंदेखील प्रचंड नुकसान झालं आहे. तसेच ट्रकने दुधाचा टँकर, मालट्रक, जीप आणि आणखी एक वाहन अशा सहा वाहनांना धडक दिल्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही वेळासाठी पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.
ट्रकने वाहनांना धडक दिल्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली होती.जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस आता अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. पोलीस आता अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसेच या दुर्घटनेतील महत्त्वाचा दोषी असलेल्या ट्रक चालकावर नेमकी काय कार्यवाही केली जाईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.