उरूळी कांचन परिसरातील हॉटेलला सुगीचे दिवस
उरुळी कांचन – विधानसभेची निवडणुकी जशाजशी जवळ येऊ लागली. तशी हवेली, दौंड, पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणात बिर्याणी पार्ट्या वाढू लागल्या आहेत. त्यामुळे सध्या बिर्याणीचा दर 600 रुपयांपासून 1 हजार रुपये किलो झाला आहे.
गणपतीनंतर पित्तृपंधरवडा त्यानंतर नवरात्रीचा उपवास यामुळे चिकनचे भाव अतिशय खाली आले होते. आता कोजागरी पौर्णिमा झाल्यावर लोक मासांहार खातात. त्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली. त्यामुळे सध्या निवडणुकीचे वातावरण आहे. उमदेवार कार्यकर्त्यांसाठी हॉटेलात किंवा इतर ठिकाणी बिर्याणीचे नियोजन करीत आहेत. त्यामुळे चवीनुसार हॉटेलमधील बिर्याणीचे दर वाढले आहेत. नवरात्रात होलसेल चिकन दर 100 ते 120 रुपये होते. किरकोळ दर 160 ते 180 रुपये होते. मात्र, निवडणुकीच्या कालखंडात चिकनचे दर 180 ते 220 रुपये झाले आहे. त्यामुळे पोल्टी व्यवसायधारकाना सुगीचे दिवस आले.
याबाबत उरुळी कांचन गारवा हॉटेल मालक रामदास ऊर्फ भाऊसाहेब आखाडे यांनी सांगितले की, आमचे हॉटेल हवेली, दौंड, पुरंदर तालुक्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे संध्याकाळी प्रचार करणारे अनेकजण जेवणासाठी येतात. परंतु अचानक कितीजण येतात हे माहित नसल्याने सध्या आम्ही ग्राहक आल्यावर त्याप्रमाणात बिर्याणी बनवित आहे. 500 रुपयांपासून 800 रुपयांपर्यंत बिर्याणी बनवून देत आहे. यामध्ये चार ते पाच जेवण करतात. शिवाय चिकनचे पीस पण चांगले देत असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहक बिर्याणी खाण्यासाठी येतात.
उरुळी कांचन येथील सारिका शेंडगे म्हणाल्या की, अनेक ग्राहकांना आम्ही तुपातील बिर्याणी बनवून देत आहे. तुप महाग असल्याने 800 ते 1 हजार रुपये किलो दराने बिर्याणी बनवून देत आहे. निवडणुकीमुळे अनेक महिलांना चांगला रोजगार मिळत आहे.
तारा हॉटेलचे मालक अमित कांचन म्हणाले की, निवडणूक आणि आचारसंहितेमुळे आम्ही रात्री दहाच्या पुढे कोणालाही जेवण किंवा बिर्याणी देत नाही. त्यामुळे अनेकजण लवकर येऊन बिर्याणी पार्सल घेऊन जातात. आम्ही चिकन व मटण तसेच व्हेज बिर्याणी देत आहे. त्यामुळे ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.