दरवर्षी न चुकता येणारा. फक्त ज्यांची जन्मतारीख 29 फेब्रुवारी असते त्यांचं मात्र असं नसतं. त्यांचा वाढदिवस मागच्या पुढच्या दिवशी साजरा करावा लागतो. आपलं वय एक वर्षाने वाढलं हे सांगणारा हा दिवस. काहीजण आठवणीने कॅलेंडरवर खूण करून ठेवतात, अगदी स्वतःच्या वाढदिवसाचीसुद्धा.
आपला वाढदिवस आई-बाबांनी लक्षात ठेवावा अशी लहान मुलांची अपेक्षा असते. पतीने आपला वाढदिवस लक्षात ठेवावा स्वत:हून काही विशेष ठरवून साजरा करावा, अशी पत्नीची अपेक्षा असते. आपल्याकडे पहिल्यापासूनच वाढदिवस साजरे केले जायचे पण पारंपरिक पद्धतीने.
ज्याचा वाढदिवस असेल त्याला औक्षण करायचं. त्याचा आवडीचा गोड पदार्थ करायचा. त्याला काहीतरी भेट द्यायचं. त्यामागची भावना लक्षात घ्यायची. विशेष म्हणजे ज्या ताटावर त्या व्यक्तीचं नाव असेल ते ताट त्याला जेवायला द्यायचं. हा वाढदिवस घरातल्या घरात साजरा व्हायचा त्यामुळे तयारी नाही, अवडंबर नाही.
काहीजण या दिवशी उदास असतात. त्यांचं म्हणणं आपलं आयुष्य एक वर्षाने कमी होतं ते काय साजरं करायचं. आपल्याला वाईट वाटलं पाहिजे, हे त्यांचं मत. काही वर्षांपूर्वी पाश्चात्यीकरण इतकं वेगाने झालं आणि त्याचा जगण्याच्या प्रत्येक अंगावर परिणाम झाला. वाढदिवस केक कापून साजरा करायचा हा जणू प्रघातच पडला.
लहान मुलांसाठी जेवढी वर्षे पूर्ण झाली तेवढ्या मेणबत्त्या केकवर लावायच्या आणि विझवायच्या. आता यामागे एक कारण आहे ते असं की, या मेणबत्त्या एका दमात फुंकर मारून विझवायच्या असतात, म्हणजे मुलाच्या फुफ्फुसाची ताकद तेवढी वाढली आहे की नाही हे बघायचं. ही बाब कितीजण लक्षात घेतात.
वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे करण्याच्या प्रथेमुळे एक चांगलं झालं की, कुटुंबातल्या ज्येष्ठ व्यक्तींचे वाढदिवस साजरे होऊ लागले, त्यांनाही आपल्याला प्रेम, महत्त्व मिळतं हे जाणवायला लागलं. तर यावर काहीजण म्हणतात, कसलं तोंडदेखलं सगळं. असे वर्धापनदिन संस्था, राजकीय पक्ष, यांचे होत असतात. ते जरा मोठ्या प्रमाणात साजरे होतात.
आजकाल पहिली नोकरी, पहिलं वाहन, पहिलं घर यांचे वाढदिवस आपण साजरे करतो. कारण आयुष्यात काहीतरी मिळवलं हे त्यामागे समाधान असतं. व्यवसाय, बिझनेस यांचे वाढदिवस ग्राहकांना बोलावून साजरे केले जातात. नव्या घोषणा केल्या जातात. पगारवाढ दिली जाते. हल्ली फेसबुक, व्हॉटस्ऍप यांचं प्रस्थ वाढले, त्यामुळे वाढदिवसाच्या दिवशी अनेक शुभेच्छा मिळत असतात आणि त्या किती आल्यात यावर आपली लोकप्रियता प्रत्येकजण अजमावत असतो. त्या दूरस्थ शुभेच्छांमुळेही खूश होतात.
सगळंच वरवरचं. फेसबुकसुद्धा आपल्याला याची आठवण करून देतं बरं का! शिवाय केक, फुलं, चॉकलेट, जे पाहिजे ते देता येतं. देणारा आणि घेणारा दोघं खूश. काहीजण मात्र कॅलेंडरवर सगळ्यांचे वाढदिवस, लग्नाचे वाढदिवस, बिझनेसचे वाढदिवस लिहून ठेवतात आणि शुभेच्छा आठवणीने देतात.
ही संकल्पना जरा बदलूया. संकल्प काय फक्त नवीन वर्ष लागल्यावरच करायचे त्यापेक्षा वाढदिवसाच्या दिवशी संकल्प करायचे आणि पुढच्या वाढदिवसाच्या दिवसापर्यंत ते पूर्ण करायचे, तोच खरा वाढदिवस.
-डॉ. नीलम ताटके