लातूर – लातूरमधील उदगीर शहरात मागील काही दिवसांमध्ये अचानक अनेक कावळे मरून पडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या कावळ्यांच्या मृत्यूमागे बर्ड फ्लूचा संसर्ग कारणीभूत असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळेच लातूर जिल्हा प्रशासनाकडून तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
कावळ्यांचा मृत्यू झालेल्या परिसरातील १० किलोमीटर क्षेत्र ‘अलर्ट झोन’ म्हणून जाहीर करण्यात आला आहे. या अलर्ट झोनमधील कुक्कुटपालन केल्या जाणा-या पक्ष्यांचे सर्वेक्षण केले जाणार असून वैद्यकीय नमुने संकलित केले जाणार आहेत.
उदगीर शहरातील कावळ्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या विषाणूजन्य आजाराने झाल्याचे भोपाळ वैद्यकीय प्रयोगशाळेकडून प्राप्त झालेल्या अहवालातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या आहेत.
यासाठी जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी उदगीर शहरातील महात्मा गांधी उद्यान, हुतात्मा स्मारक नगर परिषद वाचनालय व पाण्याची टाकी येथील १० किलोमीटर परिसर अलर्ट झोन घोषित केला आहे.
कावळ्यांचा मृत्यू झालेल्या बाधित क्षेत्रामध्ये नागरिकांच्या हालचालीस, तसेच इतर पक्षी व प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात आला आहे. या ठिकाणची खासगी वाहने बाधित परिसराच्या बाहेर लावण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रभावित क्षेत्राच्या १० किलोमीटर अंतरावरील कुक्कुट पक्ष्यांचे सर्वेक्षण करून त्यांचे वैद्यकीय नमुने प्रयोगशाळा तपासणीसाठी पाठविण्याचे आदेशात देण्यात आले आहेत.