दोन खेड्यातील पोल्ट्री नष्ट करण्याचे काम चालू
तिरुअनंतपुरम – एक महिन्यापूर्वी केरळमध्ये करोना व्हायरसचा संसर्ग झालेले तीन रुग्ण आढळून आल्यानंतर देशभरात करोना व्हायरसचे 40 रुग्ण आढळून आले आहेत. केरळ सरकार करोना व्हायरसशी लढा देत असतानाच या राज्याच्या उत्तर भागामध्ये बर्ड फ्लू म्हणजे एवियन फ्लूचे काही प्रकार आढळून आले आहेत. यामुळे केरळ सरकारने ताबडतोब याबाबात उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
प्राप्त माहितीनुसार दोन ठिकाणी चाचणी घेतली असता तेथील कोंबड्यांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे रविवारी उशिरा 13 हजार कोंबड्या नष्ट केल्या जाणार आहेत. कालपासूनच केरळ मधील पशुधन विभाग या कामाला लागलेला आहे. उत्तर केरळ मधील कोडियाथूूर आणि वेंगेरी या खेड्यामध्ये कोंबड्या मृत्युमुखी पडू लागल्यानंतर दोन दिवसापूर्वी या भागातील लोकांना बर्ड फ्लूचा संसर्ग झाल्याचा संशय आला.
या भागातील लोकांनी पशुधन विभागाला याची माहिती दिली. पशुधन विभागाने दोन दिवसांपूर्वीच येतील कोंबड्याच्या अवयवांचे नमुने घेऊन ते भोपाळ येथील प्रयोगशाळेमध्ये पाठवून दिले. भोपाळ इथून लगेच चाचणी केल्यानंतर येथे बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले. पशुधन मंत्री के के शैलजा यांनी सांगितले की नंतर परिस्थिती उच्च स्तरावरून हाताळण्यात येत आहे. लोकानी घाबरण्याचे काही एक कारण नसल्याचे त्यानी सांगितले.
2016 मध्ये केरळमध्ये मोठ्या प्रमाणात बोर्ड फ्लूचा संसर्ग झाला होता. त्यावेळी 2 लाख कोंबड्या आणि बदके नष्ट करावी लागली होती. यावेळी संबंधित शेतकऱ्यांना केरळ सरकारने नुकसान भरपाई दिली होती. हा संसर्ग वाढणार नाही यासाठी जास्तीत जास्त काळजी घेण्यात येत आहे. 25 तुकड्या तयार करण्यात आलेल्या आहेत. या 25 तुकड्या खेड्यात जाऊन कोंबड्याची पाहणी करीत आहेत. सध्या भारतामध्ये करोना व्हायरसचे जवळजवळ 39 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे विविध राज्यांमध्ये आरोग्य यंत्रणा काम करीत असतानाच बर्ड फ्लूची लागण झाली असल्याचे दिसून येत आहे.
ही बातमी पसरल्यानंतर गेल्या दोन दिवसापासून केरळमधील चिकनचे दर बरेच कमी झाले आहेत. मात्र डॉक्टरांनी सांगितले की हा प्रकार मर्यादित स्वरूपाचा आहे व तो रोखण्यात आलेला आहे. लोकांनी चिकन खाताना ते पूर्ण शिजवून खावे. कच्चे चिकन खाऊ नये अशा सूचना डॉक्टरांनी दिल्या आहेत. केरळ मधील कोंबड्यांना झालेला एवियन फ्लू माणसाला होऊ शकतो. त्यामुळे अशा आजारी असलेल्या कोंबड्या आणि त्या भागातील इतर कोंबड्या नष्ट केल्या जातात.