मुंबई – करोनाशी सामना करणाऱ्या महाराष्ट्रापुढे आता बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. परभणी, मुंबई, ठाणे, बीड आणि दापोलीमधील कोंबड्यांचा मृत्यू झाला होता. या कोंबड्यांच्या मृत्यूचा अहवाल भोपाळ येथील एका प्रयोगशाळेकडून देण्यात आला असून त्यात बर्ड फ्लूमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बर्ड फ्लूचा फैलाव झालेले महाराष्ट्र हे देशातील आठवे राज्य ठरले आहे.
तथापि, अंडी किंवा कोंबडीचे सेवन करणे पूर्णपणे सुरक्षित आहे. कारण विषाणू स्वयंपाकाचे तापमान सहन करू शकत नाही. यामुळे नागरिकांनी चिंता करण्याची गरज नाही, असे राज्याचे पशुसंवर्धन विभाग सचिव अनूप कुमार यांनी सांगितले.
परभणी येथील मुरंबा गावामध्ये एका पोल्ट्री फार्ममध्ये 800 कोंबड्या मृत अवस्थेत आढळून आल्यामुळे खळबळ उडाली होती. या कोंबड्यांना बर्ड फ्लू झाला, अशी अफवा असतानाच पशुसंवर्धन विभाग आणि प्रशासनाने पक्ष्यांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले होते. या कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूमुळेच झाला, असे आता निष्पन्न झाले आहे.
तसेच मुरंबा येथे पोल्ट्री फार्ममध्ये मृत कोंबड्या आढळून आल्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने मुरंबा गाव आणि परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या ठिकाणी असलेल्या नागरिकांना, बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला असून, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी केले आहे.
ठाण्यात आढळलेल्या मृत तीन पोपटांनाही या विषाणूची लागण झाल्याचे एका चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे. तसेच बीड आणि दापोली येथील मृत कावळयांमध्येही हे विषाणू आढळून आले आहेत. ठाणे महापालिकेने या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केले असून शहरातील पक्षी मृत्यूच्या कोणत्याही घटनेची तातडीने अहवाल द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
दरम्यान, राज्यात बर्ड फ्लूची प्रकरणे समोर आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तातडीने एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत या आजाराची तीव्रता आणि एकूण परिस्थिती समोर येईल.
अलर्ट जारी – राजेश टोपे
बर्ड फ्लू हा आजार अत्यंत धोकादायक असून याचा मृत्यूदर हा 10 ते 12 टक्के इतका आहे. त्यामुळे राज्यात हायअलर्ट जारी करण्यात आला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. जालना येथे ते बोलत होते. टोपे म्हणाले, देशातील अनेक राज्यांमध्ये सध्या बर्ल्ड फ्लूने थैमान घातले असून महाराष्ट्रातही त्याचा शिरकाव झाला आहे. यामुळे या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी पशुसंवर्धन आणि आरोग्य विभागाने अलर्ट जारी केला असल्याचे त्यांनी सांगितले.