जामखेड (प्रतिनिधी) – देशावर करोनाने सावट असताना आता बर्ड फ्लूचे संकट आले आहे. जामखेडपासून जवळच असलेल्या मोहा गावात पाच दिवसांपूर्वी मृत कावळा आढळला होता. त्याच्या तपासणीचा अहवाल नुकताच प्राप्त झाला असून, या कावळ्याचा मृत्यू बर्ड फ्लूनेच झाला असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभाग खडबडून जागा झाला असून, तीन सदस्यीय पथक तयार करून सर्व पोल्ट्री व्यावसायिकांना सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यात येत आहे.
जामखेड-बीड रस्त्यावरील रेडेवाडी फाट्याजवळ रस्त्यापासून शंभर फूट अंतरावर कावळा आणि कोकीळ पक्षी तडफडून मेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांनी वन विभागाच्या अधिकार्यांना दिली होती. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी मृत कावळा ताब्यात घेऊन पुणे येथे तपासणीसाठी पाठविला होता.
आज (दि 16) रोजी त्या मृत कावळ्याचा बर्ड फ्लूनेच मुत्यू झाला असल्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे जामखेड तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जामखेड शेजारील आष्टी व पाटोदा तालुक्यांतील काही गावांत कावळे व कोंबड्यांचा झालेल्या मृत्यूमुळे खळबळ उडाली आहे. पाटोदा तालुक्यातील मूगगाव येथे 11 कावळ्यांचा गुरुवारी (दि. 7) मृत्यू बर्ड फ्लूने झाला होता.
सध्या जामखेड तालुक्यात 80 हजारांच्या आसपास पशुधन आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण मोठ्या प्रमाणावर कुक्कुटपालन व्यवसायाकडे वळाले आहेत. लाखो रुपयांची गुतवणुक करून उभ्या केलेल्या या व्यवसायाला आता कठिण दिवस आलेत. आठ दिवसांपूर्वी शेजारील तालुक्यांत बर्ड फ्लूची लागण झाल्याने कावळ्याचा मृत्यू झाला होता.
त्याचबरोबर आष्टी तालुक्यातील ब्रह्मणगाव येथेही एक पक्षी मृत आढळून आल्याने प्रशासनाने गंभीर दखल घेत बारा गावे कन्टोन्मेंट झोन घोषित केले. आष्टी तालुक्यातील शिरापूर येथील चव्हाण व तागडवस्तीवर मंगळवारी सायंकाळी अचानक सात शेतकर्यांच्या परसातील 436 कोंबड्या दगावल्या.
हा प्रकार पशुसंवर्धन विभागाला समजताच बुधवारी सकाळी अधिकारी गावात दाखल झाले. तोवर मेलेल्या कोंबड्या गोण्यात घालून फेकून देण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक मृत व तीन अत्यवस्थ अशा चार कोंबड्या ताब्यात घेवून पंचनामा करण्यात आला होता.
आजाराचे निदान करण्यासाठी नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून, अहवाल येताच निदान होईल. या पार्श्वभूमीवर जामखेड येथील पशुसंवर्धन विभागाने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
पशुसंवर्धन विभागाकडून तालुक्यातील पोल्ट्री व्यावसायिक व कोंबड्या पाळणार्यांना या रोगाची लक्षणे व उपाययोजना या संदर्भात जनजागृती केली जात आहे. तसेच पक्ष्याचा मृत्यू झाला, तर त्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकार्याला देण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात आले आहे.
दीड ते दोन वर्षांपासून जामखेडला पशुवैद्यकीय अधिकारी नव्हता. त्यामुळे मुक्या प्राण्यांचे, पक्ष्यांचे हाल होत होते. पंचायत समितीअंतर्गत एक-दीड महिन्यापूर्वी पशुवैद्यकीय अधिकार्याची नियुक्ती करण्यात आली आहे. अधिकारे आले. मात्र कर्मचारी कमी असल्याने पुन्हा अडचणीत भर पडत आहे. जामखेड तालुक्यातील मोहा शिवारातील रेडेवाडीत आढळलेला कावळा पॉझिटिव्ह निघाल्याने पशुसंवर्धन विभागाने सक्षम टीम तयार करून बर्ड फ्लू सारख्या रोगाचा नायनाट करावा.
संजय कोठारी
सामाजिक कार्यकर्ते, जामखेड