मुंबई – राज्यामध्ये बर्ड फ्लू पूर्णपणे नियंत्रणात आला असल्याची माहिती पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांनी दिली.
राज्यात 16 फेब्रुवारी रोजी जळगांव जिल्ह्यात 38 आणि नंदुरबार जिल्ह्यात 31, असे कुक्कुट पक्षांचे एकूण 69 मृत्यू झाले आहे. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्ष्यांच्या आकस्मिक मृत्यूची राज्यात नोंद झाली आहे. मात्र त्यात कावळ्यांचा समावेश नव्हता.
राज्यात 16 फेब्रुवारी रोजी एकूण 70 पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. हे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत व पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असल्याचे केदार यांनी सांगितले.
कुक्कुट आणि बदक पक्ष्यांमधील नमुने “पॉझिटिव्ह’ आल्यानुसार, क्षेत्रास “नियंत्रित क्षेत्र’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. तेथे प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण कायद्यानुसार प्रतिबंधक निर्देश लागू करण्यात आले आहेत, असेही केदार यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.