कचऱ्यावर प्रक्रिया : अवघ्या दीड महिन्यांत दीड एकर जागा रिकामी
आणखी 20 एकर जागा रिकामी करण्याचे नियोजनदररोज 1 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया
बायोमायनिंगबद्दल महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे प्रमुख ज्ञानेश्वर मोळक यांनी माहिती दिली. या प्रकल्पात दररोज सुमारे 1 हजार टन साठलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येत असून आतापर्यंत 40 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया झाल्याचे ते म्हणाले. या प्रक्रियेनंतर त्यातून दिवसाला 8 ते 10 ट्रॅक्टर खत निर्माण होत असून शेतकऱ्यांकडून ते त्याच दिवशी घेतले जात आहे. तसेच ज्या कंपनीस हे काम देण्यात आले असून त्यांच्याकडून “आरडीएफ’ केले जात असून त्यालाही खरेदीसाठी चांगला प्रतिसाद असल्याचे ते म्हणाले.
पुणे – राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या (एनजीटी) आदेशानुसार उरुळी देवाची येथील सुमारे 20 एकर जागेवर डम्पिंग करण्यात आलेल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प महापालिकेकडून राबविण्यात येत आहे. हा प्रकल्प महापालिकेला दिलासा देणारा ठरला असून गेल्या दीड महिन्यांत या प्रकल्पांतर्गत दीड एकर जागेवरील सुमारे 40 हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. “भूमीग्रीन एनर्जी’ या कंपनीस हे काम देण्यात आले असून हे यासाठी 4 वर्षे मुदत आहे.
शहरात निर्माण होणारा कचरा उरूळी देवाची येथील कचरा डेपोत टाकण्यात येतो. कोणतीही प्रक्रिया न करता डम्पिंग केलेला शेकडो टन कचरा येथे पडून असल्याने डेपो परिसरातील ग्रामस्थांनी 2008 पासून महापालिकेविरोधात वेळोवेळी आंदोलने करण्यात आली होती. त्यानंतर महापालिकेने सुमारे 60 एकर जागेतील कचऱ्यावर कॅपिंग (शास्त्रोक्त पद्धतीने भूगर्भात कचरा जिरविणे) केले आहे. त्यानंतरही बराच कचरा या ठिकाणी शिल्लक असल्याने कचरा डेपोविरोधी कृती समितीने महापालिकेविरोधात “एनजीटी’मध्ये याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत मागील वर्षी 20 सप्टेंबर 2018 पूर्वी साचलेल्या 20 एकरमधील कचऱ्यावर बायोमायनिंग प्रकल्प उभारण्याचे आदेश न्यायाधिकरणाने पालिकेने दिले होते. 2015 ते 2018 या कालावधीत महापालिकेकडून डम्पिंग केलेला हा कचरा आहे. त्यानुसार, पालिकेने हे काम दिले असून यासाठी सुमारे 58 कोटींचा खर्च येणार आहे.
कचऱ्यावर बायोमायनिंग करण्यात येणारा हा देशातील पहिला प्रकल्प आहे. या प्रकल्पासाठी 58 कोटींचा खर्च येणार असला, तरी प्रत्यक्षात जी जागा रिकामी होणार आहे. त्याची रेडीरेकनरनुसार, किंमत 150 कोटींच्यावर आहे. तसेच गेल्या दीड महिन्यांपासून हा प्रकल्प चांगल्या पद्धतीने सुरू असून, आयुक्तांनीही या प्रकल्पाची नुकतीच पाहणी केली. प्रक्रिया क्षमता वाढविण्याबाबत सूचना केल्या आहेत.
– ज्ञानेश्वर मोळक, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन, मनपा.