पुणे – बाणेर येथील कचरा प्रकल्पातून दुर्गंधी येत असल्याची स्थानिक नागरिकांची तक्रार असून, हा प्रकल्प अन्यत्र नेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी या तक्रारीसंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांची शुक्रवारी भेट घेतली.
शहरातील अन्य कचरा प्रकल्पांबाबत नागरिकांच्या तक्रारी आल्यास त्याचाही विचार करू, असे आश्वासन पाटील यांनी या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिले. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने आणि सभागृह नेते धीरज घाटे उपस्थित होते.
महापालिकेच्यावतीने बाणेर येथे कचऱ्यापासून बायो सीएनजी फ्युएल (जैव इंधन) तयार करण्याचा प्रकल्प उभारला आहे. नोबल कंपनीच्या माध्यमातून सुरू असलेल्या या प्रकल्पात दररोज 200 टन कचरऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते.
कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या सीएनजी फ्युएलचा वापर पीएमपीच्या बसेस चालवण्यासाठी करण्याचे प्रयोग झाले आहेत. परंतु या प्रकल्पामुळे त्या परिसरात दुर्गंधी पसरली असून हा प्रकल्प बंद करावा, अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांनी पाटील यांच्याकडे केली. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी आयुक्तांची भेट घेतली.
हडपसर परिसरात कचऱ्याचे अनेक प्रकल्प आहेत. तेथील नागरिकही सातत्याने तक्रार करत असल्याबाबत पाटील यांच्या निदर्शनाला आणून दिले, त्यावर हडपसरमधील नागरिकांनी माझ्याकडे अद्याप तक्रार केलेली नाही. त्यांची तक्रार आल्यास त्यांच्या मागणीचाही विचार करण्यात येईल, असे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.