जयपूर – पंजाबप्रमाणेच राजस्थान सरकारनेही केंद्र सरकारच्या तीन कृषी विधेयकांच्या विरोधात स्वतंत्र विधेयके मांडण्याचा निर्णय घेतला असून राजस्थान विधिमंडळाच्या अधिवेशनात 31 ऑक्टोबरला ही विधेयके सादर केली जाणार आहेत.
कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. कॉंग्रेस पक्ष शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी वचनबद्ध असून त्यादृष्टीने मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जी भूमिका घेतली आहे ती अभिनंदनीय आहे, असे वेणुगोपाल यांनी आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
राजस्थान विधिमंडळाचे 24 ऑगस्टला तहकूब झालेले आधिवेशन 31 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून त्या विषयीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही स्वतंत्र विधेयके मांडली जाणार असून पंजाबच्या विधेयकांवरतीच ही विधेयके बेतलेली असतील, असे मुख्यमंत्री गेहलोत यांनी या आधीच स्पष्ट केले आहे.