कोल्हापूर – महाराष्ट्रात पुन्हा भाजपचे सरकार यावे यासाठी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला अपक्ष आमदारांना कोट्यवधीच्या ऑफर देत होत्या, असा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेच्या काळातील 24 ऑक्टोबर 2019 ते 24 नोव्हेंबर 2019 या महिनाभरातील रश्मी शुक्ला यांच्या फोनच्या सीडीआरची चौकशी करा, अशी मागणीही कोल्हापुरातील पत्रकार परिषदेत त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
शुक्ला यांच्यावरील या आरोपांबाबत आमदार म्हणून अपक्ष निवडून आलेले आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनीही दुजोरा दिला आहे. वास्तविक; अशा वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांनी अशा कामांमध्ये असणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करण्याच्या प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दिला आहे. त्यांच्या या फोन टॅपिंग बरोबरच त्यांनी बदल्यांबाबतही माहिती दिली होती. दरम्यान, बहुतांशी बदल्या या अस्थापना मंडळाच्या संमतीने झाल्या होत्या. काही थोड्याच बदल्या बाहेरच्या होत्या.
रश्मी शुक्ला यांनी समाजविघातक शक्ती असणाऱ्यांचे फोन टॅप करावे लागतील, असे म्हणून परवानगी घेतली आहे. परंतु त्यांनी तर मंत्र्यांचेच फोन रेकॉर्ड केले, ही बाब अत्यंत गंभीर गुन्हा आहे, असे कालच राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आता महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर येण्याचे स्वप्न विसरून जावे. कारण, महाविकास आघाडी भक्कम आहे. “लूज बॉल आला की सीमेपार घालवतो.’ असे फडणवीस म्हणाले होते. पण त्यांना एकही बॉल सीमेपार घालवता आला नाही. एक बॉल उडवून मारला, तोही झेलबाद झाला असता. त्यांना बॅटिंगही व्यवस्थित करता येत नाही, असा टोलाही मुश्रीफ यांनी लगावला.
अंबानींच्या घरासमोरील स्फोटक ठेवल्याचे प्रकरण आणि मनसुख हिरेन यांची हत्या प्रकरण हा तपास एटीएसने केला असता, तर तो दोनच दिवसात पूर्ण झाला असता. वास्तविक, या तपासाची दिशा भरकटण्यासाठीच विरोधक अशी प्रकरणे उकरून काढत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
अधिकारी खाल्ल्या मिठाला जागत आहेत
याआधीच्या भाजप सरकारच्या काळात बऱ्याच अधिकाऱ्यांना पोस्टिंग मिळाले असल्यामुळे ते खाल्ल्या मिठाला जागत आहेत. वास्तविक; त्यांनी कुणा व्यक्तीच्या नव्हे तर सरकारच्या खाल्ल्या मिठाला जागले पाहिजे. मुख्यमंत्री अशा अधिकाऱ्यांबाबतीत योग्य ती खबरदारी घेऊन कारवाई करतीलच, असे मुश्रीफ म्हणाले.