पुणे – करोना संकटकाळात शेतकरी त्रस्त असताना आता बोगस बियाण्यांमुळे त्यांच्यावर आणखी मोठे संकट कोसळले आहे. राज्यातील सर्वच भागांत बोगस बियाणे पुरवल्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अशा कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी विविध शेतकरी संघटना करत आहेत. मात्र, शासन आणि प्रशासकीय पातळीवर या कंपन्यांना पंखाखाली घेतले जात असल्याचा आरोप होत आहे.
खरीप हंगाम वाया जाऊ नये, यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी पैशांची जमवाजमव करून वेळेत पेरणी केली. मात्र, सोयाबीनचे बियाणे उगवलेच नाही, अशी जवळजवळ संपूर्ण राज्यात स्थिती आहे. पुणे जिल्ह्यातील काही भागांत बाजरीचे बियाणेदेखील उगवले नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे.
मोठ्या मेहनतीने पेरणी केल्यानंतर बियाणे उगवलेच नसल्याने आता शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे त्याला दुबार पेरणीसाठी तातडीने मदत करणे आवश्यक आहे. सोबतच शेतकऱ्यांच्या जीवनाशी खेळणारे कंपनीचे अधिकारी आणि या बोगस बियाणे कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची गरज आहे, असे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे.